गडचिरोली – महागाव येथील एकाच परिवारातील पाच व्यक्तींच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यास गडचिरोली पोलीसांना यश आले आहे. या पाच लोकांचा नैसर्गिक मृत्यू नसून घरातील सूनेनेच मेहुण्याच्या पत्नीच्या मदतीने वडिलांच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी या लोकांना विष देऊन मारल्याचे उघड झाले आहे.
मागील काही दिवसापासून अहेरी तालुक्यातील महागाव येथील रहिवासी शंकर पिरु कूभारे यांचेसह त्यांचे परिवारातील चार व्यक्तींचा अवघ्या वीस दिवसांचे कालावधीत अचानक आजारी पडून मृत्यू झाल्याने त्या परिसरात भीतीचे आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले होते.
सर्व प्रथम दिनांक 20 सप्टेंबर रोजी शंकर कुंभारे व त्यांची पत्नी विजया कुंभारे यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना अहेरी आणि त्यानंतर चंद्रपूर व शेवटी नागपूर येथील नामांकित रुग्णालयात उपचारकामी भरती करण्यात आले. परंतु दिनांक 26 सप्टेंबर रोजी शंकर कुंभारे व दिनांक 27 सप्टेंबर रोजी त्यांच्या पत्नी सौ. विजया कुंभारे यांचा लागोपाठ दिवसात मृत्यू झाला.
त्या धक्क्यातून सावरत असताना अचानक त्यांची गडअहेरी येथे राहणारी त्यांची मुलगी कोमल दहागावकर व मुलगा रोशन कुंभारे यांची तसेच शंकर कुंभारे यांची मुल येथे राहणारी साली आनंदा ऊर्फ वर्षा उराडे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात भरती करण्यात आले.
अनेक औषध उपचार करुन देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न होता दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यामध्ये दिनांक 8 ऑक्टोबर रोजी कोमल दहागावकर दिनांक 14 ऑक्टोबर रोजी आनंदा ऊर्फ वर्षा उराडे व दिनांक 15 ऑक्टोबर रोजी रोशन कुंभारे याचा मृत्यू झाला.
आई वडील उपचारकामी रुग्णालयात भरती असल्याची माहिती मिळताच शंकर कुंभारे यांचा दिल्ली येथे नोकरी निमित्त वास्तव्यास असलेला मोठा मुलगा सागर कुंभारे हा चंद्रपूर येथे आला असता, आई वडीलांच्या मृत्यूनंतर तो दिल्ली येथे परत गेल्यावर अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने त्यास उपचारकामी दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले.