पुणे – शहराला 2023-24 वर्षासाठी सुमारे 20.90 टीएमसी पाणी मागणीचे अंदाजपत्रक मनपा प्रशासनाने जलसंपदा विभागास सादर केले होते.मात्र, या मागणीला केराची टोपली दाखवत विभागाने 12.82 टीएमसी पाणीसाठा मंजूर केला आहे. दरम्यान, खडकवासला धरणसाखळीत 27 टीएमसी पाणी असतानाही पुणेकरांचा घसा कोरडाच राहण्याची चिन्हे आहेत.
महापालिकेत समाविष्ट गावे, पाणीगळती तसेच गेल्या काही वर्षात महापालिकेचा असलेला प्रत्यक्ष वापर याच्या आधारावर पालिकेने अंदाजपत्रक सादर केले. मात्र, हे दावे फेटाळत जलसंपदा विभागाने पुणेकरांची बोळवण केली आहे. तर महापालिकेने मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी वापरल्यास या तीन पट दंड आकारण्यात येणार असल्याचा फतवा जलसंपदाने पत्राद्वारे दिला आहे. मागील वर्षी पालिकेस 12.42 टीएमसी पाणी मंजूर केले होते. त्यात यंदा 0.40 टीएमसीची वाढ करण्यात आली आहे.
महापालिकेने हद्दीत समाविष्ट झालेल्या 34 गावांची लोकसंख्या दहा लाख प्रस्तावित करत या गावांसाठी 2.36 टीएमसी पाण्याची मागणी केली होती. तसेच या गावांमधील 16 संस्थांनाही महापालिकाच पाणी देत असल्याचे नमूद केले. मात्र, पालिकेचा दावा खोडून काढत 10 गावे तसेच 16 संस्थांना 2.36 टीएमसी पाणी आम्ही देत असल्याचे सांगत जलसंपदा विभागाने पाणी कमी आहे.
याशिवाय महापालिकेने जलसंपदा विभागाकडे मागणी केलेल्या एकूण 20.90 टीएमसी पाण्यात तब्बल 35 टक्के गळती (7.13 टीएमसी) नमूद केली होते. मात्र, जलसंपदा विभागाने या मागणीला कात्री लावत पाणीगळती केवळ 13 टक्केच गृहीत धरली आहे. यात गळतीपोटी 1.47 टीएमसी पाणी मंजूर नमूद केले आहे. त्याचा फटका महापालिकेस बसला आहे. समान पाणीपुरवठा योजना 2026 पर्यंत पूर्ण होणार असली, तरी त्यानंतरही पाणीगळती 20 टक्के राहणार आहे. असे असतानाही गळती केवळ 13 टक्के गृहीत धरल्याने पुणेकरांना फटका बसत आहे.
महापालिकेची मागणी मंजूर काय झाले
मागणी – 20.90 टीएमसी 12.82 टीएमसी
गळती – 7.13 टीएमसी 1.47 टीएमसी
समाविष्ट गावांसाठी पाणी – 3.50 टीएमसी 1.15 टीएमसी
पाच वर्षांतील पाण्याचा वापर
- 2018-19 – 19.19 टीएमसी
- 2019-20 – 20.21 टीएमसी
- 2020-21- 20.27 टीएमसी
- 2021-22 – 20.24 टीएमसी
- 2022-23 – 20.49 टीएमसी