जळगाव: पती-पत्नी’मध्ये कौटुंबिक वाद झाले. त्यानंतर पतीच्या ताब्यात असलेल्या मुलीचा ताबा मिळत नसल्याने विवाहित महिला चक्क पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर झाडावर चढली. झाडावर चढल्यानंतर सदर महिलेने ओढणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ३० मिनिटे चाललेल्या या नाट्यानंतर पोलिसांनी झाडावर चढून महिलेला खाली उतरविले.
पतीकडून मुलीचा ताबा मिळावा म्हणून पोलिसांना सांगून थकले. पोलीस अधीक्षकांना भेटायला आलो, मात्र त्यांनी भेट नाकारली. त्यामुळे अश्विनी संतापाच्या भरात झाडावर चढल्या. आणि गळ्यात रुमाल गुंडाळला, जोपर्यंत मुलीचा ताबा मिळणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. पोलिसांनी मदतीचे आश्वासन दिल्यानंतर महिलेला खाली उतरविण्यात आले. त्यानंतर अश्विनी व तिच्या आई वडिलांना ताब्यात घेण्यात आले.
काय आहे प्रकरण?
अश्विनी पंकज पाटील (रा.विरवाडे, ता.चोपडा ह.मु.गाढोदा, ता.जळगाव) या महिलेने झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना तकादा लावून सुद्धा मुलीचा ताबा मिळत नसल्याचे महिलेचे म्हणणे आहे. अश्विनी व पंकज यांच्या लग्नांनंतर २ लाख रुपयांसाठी अश्विनीचा छळ करण्यात आला. त्यानंतर नातेवाईकांच्या बैठकीत वाद मिटवल्यानंतर पंकज नोकरीसाठी पुण्यात गेला. पुण्यात देखील तिचा छळ करण्यात आल्याचे वृत्त आहे.
दरम्यानच्या काळात अश्विनीने मुलीला जन्म दिला. त्यानंतर अश्विनीचे वडील पुण्यात आले असता तेव्हा सासरच्या लोकांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. काहीदिवसानंतर सासरच्या लोकांनी मुलीला हिसकावून घेत अश्विनीला घराबाहेर हाकलले होते. त्यानंतर अश्विनी माहेरी गेली. तिथे तिने झोपेच्या गोळ्या सेवन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर सासरच्या लोकांवर जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला होता.