पिंपरी – पुणे जिल्ह्यातील रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयासह पालिकेच्या इतर रूग्णालयात आर्थिक वर्षांतील 11 महिन्यात 18 गरोदर महिलांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या गर्भवती महिलांची आकडेवारी पाहता मृत्यूचे प्रमाण 0.09 टक्के इतके अल्प असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमधील ही स्थिती खूपच दिलासादायक आहे.
पुणे जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातील रूग्ण महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात उपचार घेण्यासाठी रूग्ण येतात. आर्थिक दुर्बल घटकासह सर्वसामान्य रूग्णांसाठी हे रूग्णालय मोठे वरदान आहे. बाह्य रूग्ण विभागात (ओपीडी) दररोज पंधराशे ते सोळाशे रूग्ण दररोज उपचार घेत आहेत.
तर वर्षभरात चार ते साडेचार लाख रूग्ण उपचार घेतात. वायसीएमसह महापालिकेच्या जिजामाता, भोसरी, आकुर्डी, थेरगाव, यमुनानगर आणि सांगवी येथील रूग्णालयात गरोदर महिलांच्या प्रसुतीची व्यवस्था आहे. या सातही रूग्णालयात गेल्या 11 महिन्यात 18 हजार 542 महिलांची प्रसुती झाली यामध्ये एकट्या वायसीएम रूग्णालयात 6 हजार 682 गरोदर महिलांची प्रसुती झाली आहे. महापालिकेच्या सर्व रूग्णालयांत मिळून 18 गरोदर महिलांचे मृत्यू झाले आहेत.
अत्यवस्थ स्थितीत आणले जाते वायसीएममध्ये
एखाद्या गरोदर महिलेला त्रास होत असल्यास नातेवाईक अगोदर जवळच्या रूग्णालयात भरती करतात. तसेच तेथे उपचार होत नसल्यास आणि रुग्ण अत्यवस्थ होऊ लागल्यास अतिंम टप्यात रुग्णाला वायसीएम रूग्णालयात पाठविले जाते. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात रूग्ण दाखल झाल्यानंतर रूग्णावर उपचार करण्यासाठी वायसीएमच्या डॉक्टरांना शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. विशेषत: ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला रुग्णांना उपचारासाठी खूपच विलंब झालेला असतो. अशा वेळी डॉक्टरांचे प्रयत्नही अयशस्वी ठरतात. गोर-गरीब रुग्ण, ग्रामीण भागातून येणारे रुग्ण तसेच अत्यवस्थ परिस्थितीत दाखल केलेल रुग्ण असतानाही वायसीएम आणि महापालिकेचे डॉक्टर व वैद्यकीय स्टाफ मृत्यू दर आटोक्यात ठेवण्यास यशस्वी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात पुणे जिल्ह्यातील मावळामधील दुर्गम भागासह आसपासच्या अन्य तालुक्यांमधूनही गरोदर महिला प्रसुतीसाठी येतात. अनेक वेळा रूग्ण गंभीर झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात वायसीएममध्ये दाखल केले जातात. अशा अवस्थेतही रूग्णाला दाखल करून घेण्यात येते. त्यांच्यावर उपचार करुन वाचविण्याचा डॉक्टर प्रयत्न करतात.
-डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी