वेळीच रुग्णालयात दाखल न झाल्याने दगावताहेत रुग्ण : मृत्यूचे प्रमाण 6 टक्क्यांहून अधिक
पिंपरी -पिंपरी चिंचवड शहरामध्ये शुक्रवार रात्रीपर्यंत 1117 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहराबाहेरील 208 रुग्णांचा समावेश आहे. शहराबाहेरील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा विचार केला तर शहराबाहेरील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण तुलनेने खूप अधिक आहे. शहरातील रुग्णांचा मृत्यूदर दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर शहराबाहेरील रुग्णांच्या मृत्यूची टक्केवारी 6.19 टक्के इतकी आहे.
शहरामध्ये आतापर्यंत 53 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. शहरामध्ये मार्च महिन्यामध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर एप्रिल महिन्यापासून शहरामध्ये सातत्याने करोनाबाधित रुग्णांमध्ये भर पडत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. आतापर्यंत शहरातील 53,289 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर 909 जणांचे प्राण गेले आहेत. म्हणजेच शहरातील एकूण रुग्णांच्या प्रमाणात मृत्यूचे प्रमाण 1.70 टक्के आहे. तर शहराबाहेरील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 6.19 टक्के इतके आहे.
आतापर्यंत शहराबाहेरील 3360 रुग्ण उपचारासाठी शहरातील खासगी आणि महापालिकेच्या रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यापैकी 208 जणांचा मृत्यू झाला आहे. याचे प्रमाण 6.19 टक्के इतके आहे. त्यावरून शहराबाहेरील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण शहरातील रुग्णांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट होते.
शहरातील वायसीएम, भोसरी व जिजामाता रुग्णालयामध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. जुन्नर, खेड, आंबेगाव या ग्रामीण भागातूनही रुग्ण उपचारासाठी दाखल केले जातात. ग्रामीण भागातून येणारे बहुतांश रुग्ण ग्रामीण भागात उपचार घेतात. त्याठिकाणी रुग्णांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही तर त्यांना शहरातील रुग्णांलयामध्ये जाण्याचा सल्ला दिला जातो. अशावेळी रुग्णांची प्रकृती जास्त ढासळलेली असते. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करताना वैद्यकीय पथकाला अडचणी येत असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे.
ग्रामीण भागात वैद्यकीय यंत्रणा कधी सुधारणार?
करोनानंतर शहरामध्ये बाराहून अधिक कोविड रुग्णालये बनविण्यात आली. अत्यंत कमी वेळेत जम्बो हॉस्पिटल तयार करण्यात आले. आधीच अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या वैद्यकीय यंत्रणेला आणखी बळकटी देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. परंतु ग्रामीण भागात अजूनही अद्यावत वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध नाहीत. आजार बळावल्यास ग्रामीण भागातील रुग्णांला थेट पिंपरी-चिंचवडच्या वायसीएम रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते. ही परिस्थिती आजची नसून गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. यामध्ये प्रामुख्याने जुन्नर, खेड, आंबेगाव भागातील रुग्णांची संख्या अधिक असते. जर शहरांमध्ये एवढा खर्च होऊ शकतो, तर ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालये अद्यावत का केली जात नाहीत? त्यांची क्षमता का वाढविली जात नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोविड सेंटरने तारले
करोनाच्या सुरुवातीला महापालिकेच्या सर्व रुग्णालयांची क्षमता तपासण्यात आली होती. त्यावेळी वायसीएम, भोसरी नवीन रुग्णालय, जिजामाता रुग्णालय व महापालिकेची अन्य सात रुग्णालयांमध्ये मिळून 1143 रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता होती. या सर्व रुग्णालयांमध्ये सुमारे 399 डॉक्टर आणि 449 परिचारिका असे मनुष्यबळ उपलब्ध होते. या क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण शहराबाहेरुनच उपचारासाठी दाखल झाले. शुक्रवारी सायंकाळपर्यंत 1005 शहराबाहेरील करोनाबाधित रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत होते. आतापर्यंत शहराबाहेरील 2319 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शहरातील दहा हजाराहून अधिक करोनाबाधित रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. महापालिकेने ठिक-ठिकाणी कोविड सेंटर आणि जम्बो हॉस्पिटल उभारले असल्याने पालिका प्रशासन सर्व रुग्णांना उपचार देऊ शकत आहे.
शहराबाहेरील रुग्णांना वेळेत रुग्णालयात दाखल केले जात नाही. त्रास सुरू झाल्यानंतर गावातील एखाद्या रुग्णालयात उपचार केले जातात. त्यानंतर पुन्हा तालुक्याच्या ठिकाणी दोन-तीन दिवस उपचार केले जातात. तिथे रुग्णांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही तर त्याला शहरातील रुग्णालयात रेफर केले जाते. मात्र त्यावेळी उशीर झालेला असतो. रुग्णांची प्रकृती जास्त खालावलेली असते. त्यामुळे उपचाराला प्रतिसाद मिळत नाही. शहरातील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे. कारण ते रुग्णालयात लवकर पोहचतात.
– डॉ. राजेश वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय.