द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची उद्विग्नता
माळेगाव (वार्ताहर) – राज्यात विधानसभा निवडणुका होऊन महिना होत आला. मात्र, सरकार अद्यापही स्थापन झालेले नाही. कोणताही पक्ष सत्तेस्थापनेसाठी पुढे येत नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने कृषि व्यवस्थे संदर्भात कोणताही निर्णय होत नसल्याने राज्यपालांनीही शेतकऱ्यांनी चेष्टा केल्याने जाहीर झालेली तुटपुंजी मदत सरकारला पुन्हा मनीऑर्डरने परत पाठवणार असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.
राज्यपालांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी प्रति हेक्टर आठ हजार तर फळबागांसह बारमाही पिकांसाठी 18 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र फळ भागातील द्राक्ष पिकासाठी एकरी एक ते दीड लाख रुपये खर्च होत असल्याने सरकारची ही मदत तुटपुंजी असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
बारामती तालुक्यातील निरावागज येथील भानुदास डोंबाळे या शेतकऱ्याच्या दीड एकर द्राक्ष बागेची पूर्ण नासाडी झाली आहे. झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळेल, अशी आशा असलेल्या शेतकऱ्याला प्रति एकर लाख दीड लाख रुपये खर्च केलेल्या पिकाचे केवळ, प्रति हेक्टर 18 हजार रुपये मिळणार असल्याचे समजताच उद्विग्न होऊन आपल्या द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवण्यास सुरुवात केली आहे.
डोंबाळे यांना आपल्या दीड एकर द्राक्ष बागेतून प्रति वर्षी दहा ते अकरा लाख रुपये मिळतात. मात्र, अवकाळी पावसाने त्यांच्या द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शून्य उत्पादन होणार असल्याने व सरकारच्या तुटपुंज्या मदतीमुळे त्यांनी आपली द्राक्ष बाग तोडण्याचा आणि मदत मिळालीच तर ती पुन्हा सरकारला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.