पारनेर – पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा मिल्क ऍन्ड ऍग्रो प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या डेअरीने दूषित पाणी कुकडी कॅनॉलच्या चारीला सोडल्यामुळे परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. या पाण्यामुळे शेती नापीक झाली असल्याचा आरोप करून या डेअरीवर कायदेशीर कारवाई करून दंड करण्यात यावा, या मागणीचे अर्ज निघोज येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.
निघोज येथील मळगंगा डेअरीचे दूषित पाणी परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीतून जात आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की मळगंगा मिल्स डेअरीची स्थापना 22 वर्षांपूर्वी झाली असून तेव्हापासून त्यांनी दूषित पाणी कुकडी कॅनॉलच्या चारीत सोडले आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांसह शेतकऱ्यांचे देखील अतोनात हानी झाली. त्यामध्ये शेत जमीन नापीक होणे, पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होणे.
शेजारील कॅनॉल आहे, परंतु या चारीत डेअरीने कब्जा केल्याने शेतकऱ्यांना पाणी देखील मिळत नाही. पाणी सोडले तर चारीतील मैलामुळे शेतीचे नुकसान होते. अंदाजे 500 एकर क्षेत्र या दूषित पाण्यामुळे नापीक झाले आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून दखल घेतली जात नाही. ग्रामपंचायत याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. संबंधित प्रशासनाने हे पाणी बंद करावे, अन्यथा आम्ही हरित लवादाकडे याचिका दाखल करू असा इशारा येथील शेतकरी बाळासाहेब कवाद यांनी दिला आहे.