मुंबई – 2016 मध्ये नोटांच्या कारखान्यात छापलेल्या तब्बल 88 हजार कोटींच्या नोटा गायब झाल्याचा आरोप होत आहे. या नोटा महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ करण्यासाठी वापरण्यात आल्या का? असा सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला विचारला.शिवसेनेच्या 57 व्या वर्धापण दिनानिमित्त उद्धव ठाकरे गटाच्या शिबीरात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे- फडणीस यांच्यासोबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर देखील हल्लाबोल केला आहे.
राऊत म्हणाले, नाशिक, बंगळूरू आणि देवस मध्यप्रदेश येथे नोटा छापण्याचे सरकारचे कारखाने आहेत. तेथून 88 हजार कोंटींच्या नोटा बेपत्ता झाल्या. छापलेल्या नोटांचे ट्रक गायब झाले हे ट्रक गेले कुठे? 88 हजार कोटी रुपये नाशिक, देवास आणि बंगळूरू या तीन नोटा छापण्याच्या कारखान्यातून गायब होतात, मग मी असं म्हणतो आमच्या महाराष्ट्रात जो खेळ झाला त्यासाठी हे पैसे वापरले नाहीत ना? आजही याला फोड त्याला फोड हा खेळ चालू आहे.
तसेच, मुंबईत लूटालुट चालली आहे आणि महाराष्ट्रातही तेच सुरू आहे. या लुटीच्या कथा ऐकून दोन ओळी सुचतात. “दो मस्ताने चले जिंदगी बनाने चुना लगाके पुरा देश डुबाने, “बरं जसे हे दोन मस्ताने दिल्लीत आहेत तसे महाराष्ट्रात देखील आहेत. जे महाराष्ट्र, मुंबई लुटतायेत, असा टोलाही त्यांनी लगाविला.
नोटांचे प्रकरण काय आहे?
नाशिक, देवास आणि बंगळूरू येथील सरकारी छापखान्यातून 500 रुपयांच्या अब्जावधी मुल्याच्या नोटा गायब झाल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरबीआयच्या 2016-17 आर्थिक वर्षाच्या अहवालातही नोटा गायब झाल्याचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. छपाई केलेल्या नोटांपैकी 7,260 दशलक्ष नोटा रिझर्व्ह बॅंकेत पोहोचल्याच नाहीत. गायब झालेल्या 500 रुपयांच्या सर्व नोटा नवीन डिझाईनच्या आहेत. या नोटांचे एकत्रित मूल्य तब्बल 88 हजार कोटी रुपये इतके आहे.
जोपर्यंत इच्छा तोपर्यंतच ‘मविआ’त
जोपर्यंत आपली इच्छा असेल, तोपर्यंत आपण महाविकास आघाडीत राहू. राजकारणात काहीही होऊ शकते, असेही मत राऊतांनी व्यक्त केले. तसेच आम्ही स्वबळावर विधानसभेवर भगवा फडकवणार असल्याचा दावाही त्यांनी केला. आम्ही स्वभावावर सत्ता आणणार आहोत. हा आमचा पक्ष आहे आणि आमची तशी इच्छा आहे. तसेच आम्ही लोकसभेच्या 19 जागा निवडून आणणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.