पुसेगाव (प्रतिनिधी) :- बुद्धीभेदाचे व लबाडीचे राजकारण करत केवळ बोंबा मारणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून खटाव तालुक्यातील इंच ना इंच भूमी जोपर्यंत पाण्याखाली येत नाही, मतदारसंघातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही तोपर्यंत काम करत राहणार आहे, अशी ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली.
कै. लक्ष्मणराव इनामदार जिहे कटापूर उपसा जलसिंचन योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील गावांना पाणी देण्यासाठी सुमारे १७५ कोटी रुपये खर्चाच्या लिफ्ट १ व लिफ्ट २ या योजनांचा शुभारंभ नेर तलावाशेजारी आ. महेश शिंदे यांच्या उपस्थितीत करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. यावेळी रणधीर जाधव, भरत मुळे, राहुल पाटील, अभयसिह राजेघाटगे, हरी सावंत, नवनाथ फडतरे यांच्यासह गावोगावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटी व मार्केट कमिटीचे संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आ. शिंदे म्हणाले, “कै. लक्ष्मणराव इनामदार जिहे कटापूर उपसा जलसिंचन योजना पूर्णत्वास नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचंड ताकद व भरघोस निधी उपलब्ध करून दिला. १९९७ मध्ये मंजूर झालेली ही उपसा सिंचन योजना युती सरकार सत्तेतून जाताच बासनात गुंडाळली होती. ही योजना कदापिही परवडणार नाही, खटावच्या जनतेला कधीच पाणी मिळणार नाही अशी वलग्ना जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची नेते मंडळी करत होती. परंतु, प्रामाणिकपणा व जनतेची सेवा करण्याची इच्छा असली की सर्व काही शक्य होते. येथील जनतेच्या सहकार्याने योजना पूर्ण करून हे आम्ही दाखवून दिले आहे.
अद्यापही या मतदारसंघात काही गावे या योजनेच्या पाण्यापासून वंचित राहिली होती. त्यासाठी ३१ जानेवारी २०२३ रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत जादा २.५ टीएमसी पाण्याला मंजुरी देण्यात आली असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले.
५५ कोटी रुपये खर्चाच्या या लिफ्ट १ या योजनेअंतर्गत उत्तर भागातील अनपटवाडी, नवलेवाडी, नागनाथवाडी, ललगुण, शिंदेवाडी या वंचित गावांतील सुमारे ८०० हेक्टर लाभक्षेत्राला ०.५२३ घ.मी/ से. पाणी मिळणार आहे. तर १२० कोटी रुपये खर्चाच्या लिफ्ट २ या योजनेंतर्गत बुध, राजापूर तसेच वेटणे, रणसिंगवाडी, उंबरमळे, धावडदरे, निढळ या गावांना एक टीएमसी पाण्याची सोय होणार असून पाणी दरजाई तलावात जाणार आहे. नेर तलावाखालील गावांना २ टीएमसी पाण्याचा लाभ मिळणार आहे.