संदीप राक्षे
सातारा – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जिल्हा दौऱ्यामध्ये झालेल्या भाजपच्या शक्तीप्रदर्शनामुळे जिल्ह्यामध्ये भाजपची पाळेमुळे रुजत चालल्याचा संदेश दिला गेला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची दोन शकले झाल्यामुळे या संधीचा फायदा भाजपने उठवल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दोन दशकापासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून भाजपने विशेषतः 2019 नंतर मंडलप्रमुख, बूथप्रमुख, “संपर्क से समर्थन’ अशा विविध माध्यमांतून भाजपची ध्येयधोरणे जिल्ह्यामध्ये रुजवण्यात कोणतीही कसूर ठेवली नसल्याचे वारंवार प्रत्यास येत आहे.
केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा आणि लोकसभा प्रभारी अमर साबळे यांच्या सातत्यपूर्ण दौऱ्यामुळे सध्या तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसला भाजपने बॅकफूटवर ढकलल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांना निवडण्यात आले आहे. मात्र, बांधणीसाठी त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. थोरल्या पवारांच्या राष्ट्रवादीकडे सध्या आमदार शशिकांत शिंदे व कराड उत्तरमधून आमदार बाळासाहेब पाटील असे दोन आमदार सध्या आहेत.
राष्ट्रवादीच्या या दुफळीचा फायदा भाजप उचलणार हे नक्की. त्या दृष्टीनेच भाजपच्या वरिष्ठ कार्यकारिणीने “मिशन 45’साठी पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर येथील राजकीय हालचालींवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे बारकाईने लक्ष आहे. त्यादृष्टीने चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्हा दौरा आखण्यात आला होता. “संपर्क से समर्थन’ या अभियानासाठी पदयात्रेकरिता मुद्दाम सातारा शहरातील व्यापारी पेठ म्हणून समजल्या जाणाऱ्या सदाशिव पेठेतील खण अळीची निवड करण्यात आली होती. व्यापारी, दुकानदार, सराफ व्यावसायिक व छोटे मोठे विक्रेते यांना या पदयात्रेत सामावून घेण्यात आले. त्यांच्याशी जाणीवपूर्वक संवाद ठेवण्यात आला. येथेच छोटेखानी सभेमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी दमदार वाटचालीची ग्वाही दिलीय.
या दौऱ्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना चांगलाच बूस्टर मिळाला. 16 आमदारांची अपात्रता आणि ओबीसी आरक्षणाचे लटकलेले निर्णय यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वारंवार लांबणीवर जात आहेत. मात्र, याची तमा न बाळगता जिल्ह्यातून जास्तीत जास्त सभासद करणे, बूथ सक्षमीकरण केंद्र, शासनाच्या लाभार्थी योजनांचा प्रसार आणि प्रचार, साताऱ्यासह कराड, कोरेगाव, कराड उत्तर, दक्षिण व पाटण या सहा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची प्रशिक्षण शाळा असा कार्यक्रम भाजपने राबवून संपूर्ण वातावरण भाजपमय करून टाकले आहे. बावनकुळे यांच्या दौऱ्यानिमित्त संपूर्ण सातारा शहर भगवा झेंड्यांनी भगवेमय करून टाकण्यात आले होते. जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या पहिल्याच नियोजनामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पक्षाचे सर्व आमदार, पदाधिकारी यांच्या संयुक्त नियोजनामध्ये वातावरण निर्मितीचा भाजपचा हा प्रयत्न लोकसभा निवडणुकांसाठी तसेच आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सुद्धा परिवर्तक ठरणार आहे.
पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आग्रही
सातारा लोकसभेचा उमेदवार कोण याचा निर्णय सध्या पार्लमेंटरी बोर्डाकडे सोपवला गेला असला तरी उदयनराजे गटामध्ये या नावाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. बावनकुळे यांनी राजकीय चाणाक्षपणे हा विषय पार्लमेंटरी बोर्डाकडे सोपवलेला आहे. कराड, सातारा, वाई, खंडाळा तसेच माढा मतदारसंघातील फलटण, माण या सर्वच कार्यक्षेत्रांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला बॅकफूटवर ढकलण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम सातत्याने राबवले जात आहेत. अजित पवार सध्या महायुतीमध्ये सहभागी झाले आहेत.
सध्या त्यांची पुण्याचे पालकमंत्री म्हणून नेमणूक झाली आहे. त्याच पद्धतीने दादा गटाचे समर्थक साताऱ्यासाठीसुद्धा आग्रही असून त्यासंदर्भातील निर्णय होईल की नाही हे पाहणे सुद्धा महत्वाचे आहे. मात्र, महायुती आघाडीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपचा सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर वरचष्मा राहणार याची चुणूक या दौऱ्यामध्ये पाहायला मिळाली.