पुणे – करोनाच्या संकटामुळे देश ठप्प झाला आणि व्यापारीपेठांची रया गेली. त्यात पुण्याच्या लक्ष्मी रस्त्याच्या वैभवापासून ते तुळशीबागेतील गजबज आणि हॉटेल्समधील खवय्यांची चंगळ असे सारेच ठप्प झाले. पण, या संकटातून पुणेकर आता सावरत आहेत. तब्बल दोन महिन्यांनंतर दुकानांचे कुलूप उघडल्याने आता या पेठा पुन्हा ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. तर, सकाळच्या सत्रात वाहतूक वाढल्याने चक्क सिग्नल्सही सुरू झाले आहेत. यातून अर्थचक्राला गती मिळण्याची आशा आहे. त्या सर्व बाबींचा दैनिक “प्रभात’ने घेतलेला हा आढावा…
पेठांतील बंधने “डाऊन’!
पुणे – मागील दोन महिने सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठेसह लक्ष्मी रस्त्यालगतच्या गल्ल्यांमधील बांबूचे अडथळे शुक्रवारी सायंकाळनंतर हटवण्यात आले. मात्र, पूर्व भागातील पेठांमधील प्रतिबंधित (कंटेन्मेंट झोन) परिसराकडे जाणारे रस्ते बंदच ठेवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे धक्कादायक बाब म्हणजे कंटेन्मेंट झोनमधील नागरिक पत्रे उचकटून खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. यामुळे करोना फैलावण्याचा धोका वाढला आहे.
पेठांतून लक्ष्मी रस्त्याला जोडणारे सर्व रस्ते मागील दोन महिने बंद ठेवण्यात आले होते. बाजीराव रस्त्यालगतच्या छोट्या गल्ल्या बांबूचे अडथळे टाकून बंद करण्यात आल्या होत्या. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी प्रतिबंधित भाग वगळता, शहरातील अन्य दुकाने उघडण्याची परवानगी दिली. त्यानंतर बुधवारी सकाळी लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कर्वे रस्ता, कुमठेकर रस्त्यासह उपनगरातील बहुतांश दुकाने उघडण्यात आली.
दरम्यान, लक्ष्मी रस्त्यावर असलेले अडथळ्यांमुळे या भागात पोहोचण्यास व्यावसायिक आणि कामगारांना त्रास होता. त्यामुळे तेथील अडथळे काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती.
शुक्रवारी सायंकाळनंतर लक्ष्मी रस्ता तसेच लगतच्या उपरस्त्यांवरील बांबूचे अडथळे हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. आप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, रमणबाग प्रशाला, लोखंडे तालिम तसेच परिसरातील अडथळे हटवण्यात आल्याचे दिसून आले.
प्रतिबंधित क्षेत्राकडे दुर्लक्ष
प्रतिबंधित भाग पत्रे लावून बंद करण्यात आला आहे. परिसरातील किराणा व मेडिकल दुकाने दुपारी दोनपर्यंत खुली आहेत. तर भाजीपाला आणी दूध महापालिका आणि पोलिसांच्या समन्वयातून पुरवठा करण्यात येत आहे. असे असतानाही काही नागरिक खरेदी व इतर कारणांसाठी पत्रे उचकटून ये-जा करत आहेत. यामुळे करोनाची लागण इतर क्षेत्रांतही पसरण्याचा धोका आहे. पत्रे लावलेल्या ठिकाणी महापालिका कर्मचारी किंवा पोलिसांची उपस्थिती असणे आवश्यक आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष होत आहे.