नवी दिल्ली –मोदी सरकारने संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन बोलावले आहे. तूर्त सरकारने 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या अधिवेशनाच्या अजेंड्याविषयी कुठलेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. त्यातून लोकसभेची निवडणूक मुदतीपूर्वीच होण्याचे अंदाज वर्तवणाऱ्या चर्चांनाही बळ मिळाले आहे.
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल मीडियावरून विशेष अधिवेशनाची माहिती दिली. त्या अधिवेशनात फलदायी चर्चा होण्याची आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन 11 ऑगस्टला समाप्त झाले. त्यानंतर महिनाभराने विशेष अधिवेशन होणार असल्याने सगळेच चकित झाले आहेत.
चालू वर्षीच्या अखेरीस पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर, लोकसभा निवडणूक आठ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या निवडणुकांचा विचार करून काही महत्वाची विधेयके मार्गी लावण्याचा सरकारचा इरादा असल्याचा अंदाज बांधला जात आहे. त्याशिवाय, संसदीय कामकाज नव्या संसद भवनातून चालवले जाण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणूनही विशेष अधिवेशनाकडे पाहिले जात आहे.
देशाची राजधानी दिल्लीत 9 आणि 10 सप्टेंबरला जी-20 शिखर परिषद होणार आहे. त्यानंतर आठवडाभराने संसदेचे विशेष अधिवेशन होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर हा जन्मदिवस. त्यांच्या वाढदिवसाच्या पुढच्याच दिवशी ते अधिवेशन बोलावण्यात आले आहे. त्यामुळेही कुतूहल वाढले आहे.
इंडिया या विरोधकांच्या आघाडीतील काही नेते लोकसभेचे निवडणूक मुदतीआधीच होण्याचे भाकित करत आहेत. चालू वर्षीच्या अखेरीस ती निवडणूक होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. अशात मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावल्याने भुवया उंचावल्या गेल्या आहेत.