कोल्हापूर : गेली चाळीस वर्षे अंधारात जगणाऱ्या वयोवृद्ध पार्वतीबाईंच्या घरी अखेर प्रजासत्ताक दिनी माणुसकीचा उजेड पोहोचला. अंदाजे ऐंशीहून अधिक वय झालेल्या श्रीमती पार्वतीबाई कांबळे येळगुड (ता. हातकणंगले) येथील एका जीर्ण झालेल्या घरात गेल्या चाळीस वर्षांपासून राहतात.
घरात लाईट नव्हती. ती घ्यायला पैसे नाहीत. अर्ज कसा, कोठे करायचा याची माहिती नाही. शेजारी असलेल्या घरांच्या वीजमीटरची रिडींग घेणाऱ्या एजन्सीने ही बाब महावितरण कर्मचाऱ्यांच्या कानावर घातली.
हुपरीचे उपकार्यकारी अभियंता श्री. रामेश्वर कसबे, हुपरी ग्रामीणचे शाखा अभियंता श्री. सोमय्या जमादार, हुपरीचे श्री. सुनील मंगसुळी व रिडींग एजन्सीचे श्री. म्हाळू मुदाळे यांनी प्रजासत्ताक दिनी श्रीमती पार्वताबाईंच्या घरी वीजमीटर बसवून त्यांचे घर प्रकाशमान केले. एवढेच नव्हे तर त्यांना धीर देत विचारपूस केली. औषधोपचारासाठी आर्थिक मदत केली. महावितरणने केलेल्या कामाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत असून, समाजातील दानशूर ही मदतीसाठी पुढे येत आहेत.