मुंबई – सरलेल्या 2021 वर्षात शेअर निर्देशांकांनी उत्तम परतावा दिला आहे. या वर्षाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजार निर्देशांकात समाधानकारक वाढ नोंदली गेली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 459 अंकांनी वाढून 58,253 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.87 टक्क्यांनी म्हणजे 150 अंकांनी वाढून 17,354 अंकांवर बंद झाला.
मारुती सुझुकी, स्टेट बॅंक, बजाज फायनान्स या कंपन्यांनी मुख्य निर्देशांकांना चांगला आधार दिला. त्याचबरोबर टायटन, कोटक बॅंक, हिंदुस्तान युनिलिव्हर, ऍक्सिस बॅंक, सन फार्मा या कंपन्यांच्या शेअरच्या भावातही भरघोस वाढ झाली. मात्र वर्षाच्या अखेरच्या दिवशी एनटीपीसी, टेक महिंद्रा, पावर ग्रिड, इन्फोसिस या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. जपान आणि दक्षिण कोरियाचे शेअर बाजार बंद होते. हॉंगकॉंग आणि चीनमधील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढल्यानंतर भारतातही खरेदीचे वातावरण होते.
सरलेल्या वर्षांमध्ये भारतीय शेअर बाजारांमध्ये आक्टोबर महिन्यापर्यंत भक्कम वाढ झाली. मात्र ऑक्टोबर महिन्यानंतर महागई वाढण्याच्या शक्यतेमुळे शेअर बाजारांमध्ये काही प्रमाणात करेक्शन झाले आहे. असे असले तरी वार्षीक पातळीवर या वर्षात भारतीय शेअर बाजारांनी चांगला परतावा दिला असे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक धीरज रेल्ली यांनी सांगितले.
आता नवीन वर्षामध्ये व्याजदर वाढणार आहेत. ओमायक्रॉनचा प्रश्न काही काळ निर्माण रेंगाळणार आहे. त्यामुळे मध्यम पल्ल्यात तरी शेअर बाजार निर्देशांक वाढण्यास फारसा वाव नसल्याचे त्यांनी सांगितले. आगामी वर्षात अमेरिकेतील व्याजदर वाढ, क्रुडची दरवाढ, उत्तर प्रदेशात सहा महत्त्वाच्या राज्यातील निवडणुका, ओमायक्रॉनची वाटचाल महागाई या बाबीकडे गुंतवणूकदार लक्ष देतील आणि त्या आधारावर पोझीशन घेतील असे त्यांनी सांगितले.
ऑक्टोबरनंतर भारतीय शेअर बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बरीच विक्री केल्यामुळे निर्देशांकात घट झाली आहे. शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी 986 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. सरलेल्या आठवड्यामध्ये रुपयाचे मूल्यही बऱ्याच प्रमाणात वाढल्यामुळे गुंतवणुकदारांना निर्णय घेणे सोपे झाले. शुक्रवारी रुपयाचे मूल्य 13 पैशांनी वाढून 74.29 रुपये प्रति डॉलर झाले.