नवी दिल्ली – एकता आणि प्रेमाच्या दिशेने भारत जोडो यात्रेची कोट्यवधी पावले देशाच्या चांगल्या भविष्याचा पाया बनली आहेत. शिवाय देशातील द्वेष संपेपर्यंत ही यात्रा सुरूच राहील. देशवासीयांनी मने जोडण्याचा हा प्रवास असाच अखंड सुरूच राहील, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. भारत जोडो यात्रेच्या प्रारंभाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राहुल गांधी बोलत होते.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले की, ‘प्रवास सुरूच आहे – जोपर्यंत द्वेष संपत नाही, जोपर्यंत भारत एक होत नाही. हे माझे वचन आहे.’ गेल्या वर्षी याच काळात राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर असा सुमारे चार हजार किलोमीटरचा पायी प्रवास केला होता. यादरम्यान राहुल गांधींनी 12 जाहीरसभा घेतल्या, 100 हून अधिक पथसभा आणि 13 पत्रकार परिषदा संबोधित केल्या.
“भारत जोडो’ यात्रे नंतर राहुल गांधींची प्रतिमा परिपक्व नेत्याची झाली आहे. यापूर्वी राहुल गांधींच्या राजकीय बांधिलकीवर प्रश्नचिन्ह असायचे, पण भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी एक गंभीर राजकीय नेता म्हणून समोर आले आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो भेटीदरम्यान अनेक सेलिब्रिटी आणि प्रमुख व्यक्ती त्यांच्या यात्रेत सामील झाले होते.
कमल हासन, पूजा भट्ट, रिया सेन, स्वरा भास्कर, रश्मी देसाई, आकांक्षा पुरी आणि अमोल पालेकर यांसारखे चित्रपट आणि टीव्ही सेलिब्रिटी भारत जोडो यात्रेत सामील झाले. याशिवाय माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) दीपक कपूर, माजी नौदल प्रमुख ऍडमिरल (निवृत्त) एल. रामदास आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन इत्यादीही राहुल गांधींसोबत दिसले.
फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती, आदित्य ठाकरे, प्रियांका चतुर्वेदी आणि संजय राऊत यांसारखे राजकीय जगतातील नेते भारत जोडो यात्रेत सामील झाले होते.