अमोल मतकर
संगमनेर – तालुक्यात सायखिंडी येथे एका क्षेत्रात अवैधरित्या उत्खनन करून मोठ्या प्रमाणात करण्यात येत असलेल्या गौण खनिजचा उपशाबाबत प्रशासनाच्या 112 या हेल्पलाइनवर एकाने फोन करून माहिती दिली असता, त्यातील एका कर्मचाऱ्याने थेट त्या ठेकेदाराला फोन करून माहिती दिली. त्यामुळे यातील युवा नेता त्याठिकाणी जाऊन पोलिसांच्या शैलीत गाड्यांच्या चाव्या काढून घेत नंतर त्या ड्रायव्हरला चाव्या परत करत माझ्यामागे गाड्या येऊ द्या असे म्हणत त्या गाड्या जागेवरून दुसरीकडे पाठवण्यात आल्या असून, महसूल प्रशासन अशा गोष्टींकडे सपशेल डोळेझाक करत असल्याचे दिसून येते.
नाशिक-पुणे महामार्गावर सायखिंडी गावात एका महिलेचे क्षेत्र आहे. त्या क्षेत्रातून काही नागरिक डंपर व जेसीबीच्या साहाय्याने अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करून वाहतूक करत होते. याबाबत एका महिलेने तक्रार केली होती. त्याची दखल न घेतल्याने तिने मदतीसाठी थेट 112 या क्रमांकावर फोन करून गौण खनिजाचे उत्खनन सुरू असल्याची माहिती दिली. परंतु त्या यंत्रणेतील एकजण खबरी निघाला आणि त्याने एका युवा नेत्याला फोन करून माहिती दिली. या युवानेत्याने त्या क्षेत्रावर जाऊन पोलीस असल्याच्या अविर्भावात गाड्यांच्या चाव्या काढून घेतल्या. नंतर त्याने त्या चाव्या परत करत त्यांना माझ्यामागे या असे म्हणून तेथून सगळ्या गाड्या काढून सुरक्षित ठिकाणी ठेवल्या. दरम्यान, त्या ठिकाणी जमलेले गावातील एक-दोन जण आणि ती महिला तेथून निघून गेली आणि माझ्या एका फोनमुळे त्यांच्या गाड्या पकडल्या, असे तिच्या मनात होते.
परंतु घडले भलतेच. जो युवा नेता त्याठिकाणी आला, त्याच्याच गाड्या (डंपर) त्याठिकाणी असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. त्या महिलेची फसवणूक झाल्याचे तिला समजल्यावर तिने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचे काही एक म्हणणे कोणीही ऐकून घेतले नाही. यावरून तालुक्यातील चालणाऱ्या अवैध गौण खनिज उत्खननात प्रशासन सहभागी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
काही नागरिक अनेकवेळा तक्रार करूनही प्रशासन तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना कुणाकडे दाद मागायची असा प्रश्न पडलेला आहे. नुकताच तालुक्यातील झोळे गावात महसूलच्या पथकाने वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर ताब्यात घेतला. ग्रामस्थांनी त्याठिकाणी जेसीबी आणि इतरही ट्रॅक्टर असल्याचे सांगितले होते आणि विशेष म्हणजे वाळूउपसा करण्यासाठी जो खड्डा करण्यात आला तो जेसीबीच्या साहाय्याने करण्यात आल्याच्या खुणा त्याठिकाणी असूनही अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांवर काहीच कारवाई करण्यात आली नसल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.
चौकट
अधिकाऱ्यांची थेट मंत्र्यांकडे तक्रार!
काही तलाठ्यांच्या कारनाम्याचे व्हिडिओ व्हायरल होऊन थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोच झाले. मात्र, अधिकारी त्या तलाठ्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता महसूलमंत्र्यांनीच यात लक्ष घालण्याची मागणी गावकरी करत आहेत. याबाबत गावकऱ्यांनी मंत्र्यांना निवेदनही दिले आहे.