मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. राज्यातही महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे (Thackeray group) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून लोकसभा जागांची चाचपणी सुरू आहे.
ठाकरे गटाने मुंबईतील सहापैकी चार जागांवर निवडणूक लढवण्यासाठीची तयारी केली असून कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा देण्याचा प्रस्ताव मांडला असल्याची चर्चा सुरू आहे.
मात्र, कॉंग्रेसने मुंबईत तीन जागांवर दावा केला आहे. यामुळे आघाडीतील जागावाटपाचा तिढा कसा सोडवणार, याकडे लक्ष लागले आहे.
कॉंग्रेसचे माजी खासदार आणि नेते संजय निरुपम म्हणाले, मुंबईतील सहापैकी तीन लोकसभेच्या जागांवर कॉंग्रेस आग्रही राहणार आहे. उत्तर पश्चिम, दक्षिण मध्य आणि उत्तर मध्य मुंबई या तीन जागा कॉंग्रेससाठी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, 2004 ते 2019पर्यंत मुंबईत लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती. त्यात कॉंग्रेस सहापैकी पाच जागांवर लढली होती. मुंबईत सहा पैकी कमीत कमी तीन जागांवर कॉंग्रेसकडून उमेदवार देण्याची तयारी असल्याचे त्यांनी म्हटले.
या वेळेस आम्हाला पाच जागांची अपेक्षा नाही. या पाच जागांपेक्षा कमी जागेवर उमेदवार उतरवू, पण किती कमी उतरवायचे हे नेतृत्व ठरवणार असल्याचे निरुपम यांनी स्पष्ट केले.