वॉशिंग्टन : कोरोनाच्या साथीमुळे लादलेल्या निर्बंधामुळे समस्यांना तोंड द्यावे लागणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांशी अमेरिकेतील भारतीय दुतावासाने संपर्क साधला आहे. आम्ही भारतीय विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहोत. विद्यापीठ प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला आहे. वैद्यकीय आपत्कालीन स्थिती उद्भवली असल्याने त्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी इंडियन अमेरिकन असोसिएशन आणि भारत सरकार प्रयत्नशील आहे, असे अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजितसिंग संधू यांनी शनिवारी सांगितले.
काही विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना आठवड्याची नोटीस देऊन आपल्या मुळ देशात परतण्याची सूचना केली आहे. या पार्श्वभूमीवर संधू यांनी हे वक्तव्य केले आहे. कोरोना विषाणूंच्या साथीमुळे भारत सरकारने जारी केलेल्या प्रवासी सुचनांसदर्भात भारतीय दुतावासाने हेल्पलाईनची अखंडीत सेवा सुरू केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या साथीला माहासाथ असे जाहीर केले आहे. जगभरता एक लाख 20 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. भारतात 82 रुग्ण आढळले आहेत.