मुंबई – नव्याने स्थापन झालेल्या विरोधकांच्या “इंडिया’ आघाडीच्या बोधचिन्हाचे अनावरण 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीदरम्यान होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.
मुंबईमध्ये होणाऱ्या या बैठकीला 26 विरोधी पक्षांचे सुमारे 80 सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ही “इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक असणार आहे.
सध्या या आघाडीमध्ये 26 घटक पक्ष सहभागी झाले आहेत. या आघाडीमध्ये आणखीन काही पक्ष सहभागी होतील. दिनांक 1 सप्टेंबरला या आघाडीच्या लोगोचे अनावरण कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेश आणि मुंबईच्या नेत्यांकडून केले जाण्याची शक्यता आहे.
या बैठकीला कॉंग्रेस नेते राहुल गांधी देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या आघाडीची पहिली बैठक जूनमध्ये पाटण्यात आणि दुसरी बैठक गेल्या महिन्यात बेंगळुरू इथे झाली होती. तिसरी बैठक मुंबईतील ग्रॅन्ड हयात हॉटेलमध्ये होणार आहे.