नवी दिल्ली : देशात यावर्षी राजकीय क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. त्यातील सर्वात मोठी घटना म्हणजे मध्य प्रदेशातील तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सरकार अल्पमतात येऊन कोसळले. दरम्यान; त्यावेळी काँग्रेसकडून भाजपने राजकीय खेळी करत सरकार पाडल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, घटनेविषयी आता भाजपाच्या नेत्यानेच गौप्यस्फोट केला आहे. कमलनाथ यांचे सरकार पाडण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच भूमिका महत्त्वाची होती, असा खुलासा भाजपाचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी केला आहे.
इंदौरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी संमेलनात बोलताना भाजपाचे महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी हा गौप्यस्फोट केला. विजयवर्गीय म्हणाले,”जोपर्यंत कमलनाथ यांचं सरकार होतं, तोपर्यंत सुखानं झोपू दिलं नाही. भाजपाचा कुठला कार्यकर्ता असेल, जो कमलनाथ यांना स्वप्नातही दिसत असेल तर ते नरोत्तम मिश्रा होते. टाळ्या वाजवून मिश्रा यांचं स्वागत करायला हवं.
मी इथे पडद्यामागील गोष्ट सांगत आहे, याची वाच्यता कुठे करू नका. मी सुद्धा आजपर्यंत कुणालाही सांगितलेली नाही. पहिल्यांदाच या व्यासपीठावरून सांगतोय. कमलनाथ यांचं सरकार पाडण्यात जर कुणाची महत्त्वाची भूमिका होती, तर ती नरेंद्र मोदी यांची होती. धर्मेंद्र प्रधान यांची नव्हती. पण, कुणाला ही गोष्ट सांगू नका. मी आजपर्यंत कुणाला सांगितली नाही,” असे म्हणत विजयवर्गीय यांनी मोठा गौप्यस्फोट केला.
दरम्यान, कैलास विजयवर्गीय यांच्या दाव्याने मध्य प्रदेशातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. याविषयी बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलूजा म्हणाले,”भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी शेतकरी संमेलनात काँग्रेसनं केलेल्या सर्व आरोपांवर शिक्कामोर्तब केलं आहे. जनादेश मिळालेलं कमलनाथ यांचं सरकार नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यावरून पाडण्यात आलं होतं.”