– अमित डोंगरे
आयसीसीने भारत व इंग्लंड या दोन्ही संघांना वेळेत षटके पूर्ण केली नाहीत म्हणून सामना रकमेच्या 40 टक्के रकमेचा दंड केला आहे. या दोन संघांतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. या सामन्यात इंग्लंडचे दोन्ही डाव पूर्ण झाले होते. मात्र, भारताच्या दुसऱ्या डावात पावसाने व्यत्यय आणला व विजयाची संधी भारताच्या हातातून निसटली.
सामना अनिर्णित राहिला असला तरीही त्याचा फटका दोन्ही संघांना सारखाच बसला आहे.
षटके वेळेत पूर्ण केली नाहीत म्हणून दोन्ही संघांतील खेळाडूंना सामना रकमेच्या 40 टक्के रकमेचा दंड आयसीसीने केला. यावरच हे प्रकरण संपलेले नाही. याच मालिकेपासून कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या यंदाच्या मोसमालाही प्रारंभ झाला आहे. ही षटके वेळेत पूर्ण केली नाहीत म्हणून दोन्ही संघांचे या स्पर्धेचे प्रत्येकी 2 गुणही कापण्यात आले आहेत.
मुळात या स्पर्धेत विजय मिळवलेल्या संघाला 12 गुण देण्यात येतात. सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 4 गुण दिले जातात. मात्र, या सामन्यात जर वेळेत षटके पूर्ण केली गेली नाहीत तर 4 ऐवजी केवळ 2 गुणच दिले जातात. खरे सांगायचे तर हा प्रश्न गेल्या दशकापासून कायम आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संघांना सामन्यात नियमानुसार ठरवून दिलेल्या वेळेत षटके पूर्ण करता येत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्यातही भारतीय संघाला गेल्या तीन मोसमांपासून सातत्याने असे दंड झाले आहेत. तरीही पुन्हा येरे माझ्या मागल्या हेच चित्र दिसून येते.
वेगवान गोलंदाजांच्या प्रत्येक षटकासाठी कमाल चार मिनिटे ठरवून दिलेली असतात. तर, फिरकी गोलंदाजांसाठी अडीच मिनिटे ठरवलेली असतात. कसोटी सामन्याबाबत बोलायचे झाले तर संपूर्ण दिवसांत 90 षटकांचा खेळ झाला पाहिजे असा नियम आहे. तरीही सकाळी 9 वाजून 30 मिनिटे ते 4 वाजून 30 मिनिटे किंवा वाढीव अर्धा तास धरून 5 वाजून पाच मिनिटे या वेळात 90 षटके टाकली कशी जात नाहीत हे न उलगडलेले कोडे आहे. उपहार, चहापान किंवा पाण्याचे ब्रेक यांचा वेळ धरूनच हा कालावधी ठरवलेला असतो.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे याची पूर्व कल्पना प्रत्येक सामन्यातील दोन्ही संघांच्या कर्णधारांना दिलेली असते तसेच हे कर्णधार आपल्या गोलंदाजांनाही याची पूर्ण माहिती देतात. मग तरीही हा प्रश्न सुटत का नाही. आता आणखी एक मुद्दा म्हणजे ही षटके वेळेवर पूर्ण होतात का नाही हे पाहण्याचे काम कर्णधाराचेही असते, त्याने गोलंदाजांना याची कल्पना देणे गरजेचे असते.
विराट कोहली व ज्यो रूट यात कमी पडले हे तर दिसून येतच आहे पण मग प्रश्न हा उरतो की मैदानावरील पंच, तिसरा पंच व सामनाधिकारी काय करतात. त्यांनीही दोन्ही संघांच्या कर्णधारांनी याबाबत सामना सुरु असताना चर्चा केली पाहिजे. जर अशी चर्चा होत राहिली तरच याची पूर्ण समज संबंधित गोलंदाज व कर्णधारांना येईल. आयसीसीने भविष्यात हे असले दंड करण्यापेक्षा जागृती करावी. जागतिक क्रिकेटचे व्यवस्थापन, नियमन, विकास आणि प्रगती यांसाठी आयसीसी कटीबद्ध आहे दंडाचे पैसे गोळा करून खिसे भरण्यासाठी नव्हे.