संगमनेर, (प्रतिनिधी) – पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाखाली महिनाभर मोफत बिर्याणी खाल्ल्याचा प्रकार ताजा असतानाच या कर्मचाऱ्यांच्या मनमानीचा आणखी एक प्रकार पुढे आला आहे . या कर्मचाऱ्यांनी साठ रुपयांवरून गुंजाळवाडी परिसरातील हॉटेल मालकाला दमदाटी केल्याची घटना समोर आली आहे.
अंकुश नसल्याने हे कर्मचारी मोकाट झाले असून, हॉटेल व्यावसायिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
संगमनेर शहरालगतच्या एक मोठ्या हॉटेलमधून काही कर्मचारी अधिकाऱ्यांच्या नावाखाली मांसाहारी जेवणाचे पार्सल दररोज घेऊन जात होते. अधिकाऱ्याला जेवण द्यायला या हॉटेल मालकाने टाळाटाळ केली नव्हती.
हा हॉटेलमालक व संबंधित पोलीस अधिकारी यांची समक्ष भेट झाली असता सत्य बाहेर आले होते.आपल्या हॉटेलच्या जेवणाची चव कशी आहे, असे हॉटेल मालकाने अधिकाऱ्याला विचारल्यानंतर आपण अद्याप तुमच्या हॉटेलचे जेवण केलेच नाही, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. आपल्या नावाखाली भलतेच कर्मचारी गैरफायदा घेत असल्याचे उघड झाल्याने या अधिकाऱ्याने संबंधित कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली होती.
ही घटना ताजी असतानाच या पोलीस कर्मचाऱ्यांची आणखी एक भानगड उघडकीस आली आहे. पोलीस ठाण्यातील हे चार ते पाच कर्मचारी कधी घरी जेवण करता की नाही, असा प्रश्न संगमनेरातील नागरिकांनी यामुळे पडला आहे. गुंजाळवाडी परिसरातील हायवेलगत असणाऱ्या एका हॉटेलमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
एवढ्या गर्दीत हे पोलीस पाहुणे तेथे जातात. त्यांना वेगळा टेबल दिला जातो. त्यांचा थाट केला जातो. ते चिकन फ्रायवर ताव मारतात, पिण्याचे पाणी घेतात, जेव्हा बिल देण्याची वेळ येते तेव्हा मालकाबरोबर वाद घालतात. काही दिवसांपूर्वी असाच वाद या पोलिसांनी घातला होता. केवळ साठ रुपये कमी न केल्याने पोलिसांनी या हॉटेल मालकाला खाकीचा दम दाखवला.
तुला परवानगी कोण देत एवढ्या उशिरापर्यंत हॉटेल चालवण्यासाठी असा सवाल करत इथे काय धंदे चालतात आम्हाला माहीत आहे,असे बोलून हॉटेल मालकाला साठ रुपयांवरून दमदाटी केली. हॉटेलमालक शांत बसला तरी या कर्मचाऱ्यांचा वरच्या पट्टीतला आवाज खाली आला नाही. या घटनेमुळे हॉटेल मालकांनी संताप व्यक्त केला.संगमनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांची या प्रकरणात गंभीर लक्ष घालून संबंधित कर्मचाऱ्यांची अन्य ठिकाणी बदली करावी, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून केली जात आहे.