महाळुंगे इंगळे – औद्योगिकीकरणाने वाढत्या लोकसंख्येच्या लोंढ्यात राज्य व परराज्यातून अनेक कामगार नोकरी-धंद्याच्या निमित्ताने कारखानदारी असलेल्या चाकण व जवळपासच्या गावांमध्ये वास्तव्यासाठी आली आहेत. त्यामुळे दुचाकीवरून कामाला येणाऱ्या कामगारांना अपघातातून त्यांचा बचाव होण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने आणि कारखानदारांनी हेल्मेट सक्ती केली आहे.
उद्योग पंढरीचे नाक असलेली चाकण औद्योगिक वसाहत ऑटो हब म्हणून अल्पावधीत नावारूपास आली आहे. वाहन उद्योगाची पंढरी म्हणून चाकणचे नाव आशिया खंडातसुद्धा मोठ्या आदराने घेतले जाते. चाकण पंचक्रोशीत जवळपास एकूण आठशे ते नऊशे राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय छोट्या-मोठ्या कंपन्या व कारखाने आहेत. या कंपन्यांमध्ये कारखानदार कोट्यवधींची गुंतवणूक करून कामगारांच्या जोरावर हवे असणारे उत्पादन घेऊन बक्कळ नफा कमवतात. त्यामुळे येथे काम करणाऱ्या कामगारांची संख्याही त्याच तुलनेत मोठी आहे.
दूरवरून अनेक कामगार कंपनीत वेळेवर कामाला येण्यासाठी बहुतांशी करून दुचाकीचा वापर करतात. विस्तारती औद्योगिक नगरी, वाढती रहदारी, मोकाट वाहने दामटनारांचे मोठे प्रमाण, पुढे चाललेल्या वाहनाला मागे टाकण्याच्या प्रयत्नात होणारे अपघात त्यात अपुरे रस्ते आदींमुळे रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वाहतूक कोंडीने तर सर्वांनाच हैराण करून सोडले आहे. त्यामुळे सुपातील कधी जात्यात येऊन अलगदपणे भरडले जातील, याचा थांगपत्ता लागत नाही.
यामध्ये दुचाकीवरील अनेकांचा हेल्मेट अभावी नाहक बळी जात आहे. हे अपघाताचे वाढते प्रमाण मोठी शोकांतिका असून, सर्वसामान्य नागरिकांना विचार करायला लावणारे आहे. त्यामुळे हेल्मेट सक्ती केली आहे. दुचाकीवरून कामाला येणाऱ्या कामगारांकडे हेल्मेट, गाडी चालविण्याचा परवाना, ओळखपत्र, गाडीची महत्त्वाची कागदपत्रे जवळ नसेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई अथवा त्यास कामावर न घेण्याची आक्रमक भूमिका आता उद्योजकांनी घेतली आहे.