गरिबांना मिळणार पोटभर अन्न : हसन मुश्रीफ
नगर – प्रजासत्ताक दिनी महाविकास आघाडी सरकारच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ना. मुश्रीफ यांनी स्वतःच्या हाताने शिवभोजन थाळी वाढून दिली. तसेच त्यांनीही या भोजनाचा स्वाद घेतला. शिवभोजन योजनेमुळे गोरगरीब जनतेला दहा रुपयांत पोटभर अन्न मिळणार आहे. सामाजिक जाणिवेतून राज्य शासनाने ही योजना सुरु केली असल्याचे यावेळी ते म्हणाले.
येथील रेल्वे स्टेशनसमोरील दत्त हॉटेल येथे शिवभोजन योजनेचा शुभारंभ ना. मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक सागर पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके उपस्थित होते.
यावेळी ना. मुश्रीफ यांनी हॉटेलमधील सर्व व्यवस्थेची पाहणी केली. तसेच तेथे जेवणासाठी आलेल्या माथाडी कामगारांशी संवाद साधून त्यांना स्वत: हाताने थाळी वाढून दिली. त्यानंतर स्वत:ही या थाळीची चव घेतली. हे जेवण रुचकर आणि स्वादिष्ट असून दररोज येथे येणाऱ्या गरीब व गरजूंना याच पद्धतीने चांगले जेवण द्या, अशी सूचना त्यांनी केली.
महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि पुरोगामी राज्यात कोणीही भुकेले राहू नये, यासाठी राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात म्हणजे अवघ्या दहा रुपयांत प्रजासत्ताक दिनापासून शिवभोजन थाळी देण्याची योजना राज्य शासनाने सुरु केली. ही योजना अधिक चांगल्या पद्धतीने चालविण्याची जबाबदारी हॉटेलचालकांवर आहे. येथील परिसर स्वच्छता आणि अन्नाचा दर्जा उच्च प्रतीचा राखण्याची सूचना त्यांनी केली. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या सर्व बाबींचा वेळोवेळी आढावा घेण्याचे निर्देश दिले.
शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरातील हमाल पंचायत संचलित कष्टाची भाकर केंद्र, तारकपूर बसस्थानकासमोर हॉटेल सुवर्णम प्राईड संचलित अन्नछत्र, जिल्हा रुग्णालयाजवळ कृष्णा भोजनालय आणि मार्केटयार्ड परिसरात हॉटेल आवळा पॅलेश येथे शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.