पुणे -वीज दरवाढीचे आदेश आज ना उद्या धडकणारच होते. अखेर शनिवारी ते जाहीर झाले. ते पाहता देशाच्या अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले आहे, जेथे वीज सर्वाधिक महाग आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडले आहे.
दक्षिणेतील काही राज्यांमध्ये नुकतीच वीज दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर उत्तरेकडील राज्यांमध्येही असाच निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता महाराष्ट्रात वीज दरवाढ करण्यात आल्याने महाराष्ट्र हे सर्वात महागडी वीज मिळणारे राज्य ठरले आहे. आंध्रप्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, गोवा, तेलंगणा, गुजरात आणि मध्यप्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रात वीजेचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहेत. त्यामुळं आता आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सामान्यांना वीज दरवाढीमुळं मोठा झटका बसला आहे. गेल्या 15 दिवसांपासून महाराष्ट्रात वीज दरवाढ होणार असल्याच्या चर्चा होत्या. यापूर्वी वीज कंपन्यांनी दरवाढीचा प्रस्तावही सादर केला होता. त्यानंतर आता वीजेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शासनाने महागाईची स्थिती लक्षात घेऊन वीज बिलात दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.
अपिलाकडे लक्ष
या दरवाढीविरोधात महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने दिल्लीतील विद्युत अपिलीय प्राधिकरणाकडे अपिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही दरवाढ कायम राहणार, की सामान्य ग्राहकांना दिलासा मिळणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे.
तीन कोटी ग्राहक
राज्यात वीज खरेदी दराचे नियोजन नसल्याने हे दर 5.36 रुपयांपर्यंत गेले आहेत. यात कपात होणे शक्य आहे. पण, या गैरनियोजनाचा फटका राज्यातील 2.93 कोटी ग्राहकांना बसत असून, महाराष्ट्रात विजेचे दर अधिक आहेत.