मुंबई -छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. तर भाजपनेदेखील आज शहरात वीर सावरकर गौरव यात्रा आयोजित केली होती. यावरुन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
ठाकरे म्हणाले की, काही राजकीय पक्ष सर्व काही राजकारणासाठीच करत असतात.दुसऱ्यांचे आदर्श चोरण्यापासून ते नाव चोरण्यापर्यंत हे सर्व काही राजकारणासाठी होत आहे. पण आम्ही आमचे काम करत असून लोकांनाही याची जाणीव आहे. ज्यावेळी निवडणुका होतील, तेव्हा लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील.
खासदार संजय राऊत यांच्या धमकीप्रकरणी आदित्य म्हणाले, सध्या महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांत राज्यातील परिस्थिती भयानक होत चालली आहे.
शिविगाळ करणाऱ्यांवर कारवाई करा
उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिविगाळ करणाऱ्यांवर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यांची हकालपट्टीही झाली नाही, असे ते म्हणाले. अधिवेशन सुरू असताना भाजप कार्यकर्त्याला गद्दार गटाच्या लोकांनी मारहाण केली होती. भाजप कार्यकर्त्याला हात लावल्यावर सगळ्या केंद्रीय यंत्रणा येतील असे वाटत होते. परंतु मारहाण करणारे गद्दार गटाचे असल्याने त्यांच्यावर कारवाई झाली नाही. दोन पक्षातच गॅंगवार सुरू झाले हा प्रश्न आहे. मारहाण होऊनही कारवाई होत नसेल तर कोणाच्या दबावाखाली हे सगळे होते, असा सवाल आदित्य यांनी केला.