मुंबई -मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनाचा तो अजेंडा आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी केला.
मोदी सरकारने पुढील आठवड्यात विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्या अधिवेशनाचा अजेंडा अद्याप उघड करण्यात आलेला नाही. तो धागा पकडून पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना सनसनाटी भाष्य केले. मुंबई आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. ते भाजपला खुपत असल्याने मुंबईतील शक्तिस्थाने हलवण्याच्या हालचाली होत आहेत.
एअर इंडियाचे मुख्यालय, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र, हिरे बाजार मुंबईबाहेर नेण्याची पाऊले उचलली जात आहेत. मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारही गुजरातला हलवण्याचा प्लॅन आहे.
मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याच्या मार्गात मोठा अडथळा ठरत असल्यानेच महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. मोदी सरकारने करोना संकट, नोटबंदी किंवा मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यांवरून विशेष अधिवेशन बोलावले नाही. मात्र, आता आपल्या लहरीनुसार सरकारने अधिवेशन बोलावले आहे, असे टीकास्त्रही पटोले यांनी सोडले.