इंदौर – पदवी प्रदान समारंभाच्यावेळी मध्यप्रदेशचे राज्यपाल आणि कुलपती मंगू भाई पटेल यांच्या हस्ते पदवी न मिळाल्याने देवी अहिल्या विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. पदवी प्रदान समारंभ लांबल्यामुळे विद्यार्थ्यांना पदवी प्रदान न करताच राज्यपाल जायला निघाल्यावर विद्यार्थ्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.
राज्यपालांच्या अनुपस्थितीत पदवी न स्वीकारण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला. त्यानंतर राज्यपालांनी आपल्या कार्यक्रमामध्ये फेरबदल केला आणि विद्यार्थ्यांना पदवी आणि पदके स्वतः प्रदान केली.
मध्यप्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री मोहन यादव यांनी नंतर पत्रकारांना याबाबत माहिती दिली. राज्यपालांकडे मर्यादित वेळ होता. समारंभामध्ये ज्यांना पदवी प्रदान करायची होती, अशा विद्यार्थ्यांची संख्या फार जास्त होती. मात्र आपण विनंती केल्यावर राज्यपालांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्याचे मान्य केले, असे यादव यांनी सांगितले.
पदवी प्रदान करण्याच्या समारंभात 148 जणांना पी.एचडी, 113 जणांना सुवर्ण पदके प्रदान केली जाणार होती. त्यापैकी 50 जणांना पी.एचडी आणि 50 जणांना सुवर्णपदक राज्यपालांच्या हस्ते दिली जाणार होती. तर उर्वरित विद्यार्थ्यांना कुलगुरूंच्या हस्ते पदवी प्रदान केली जाणार होती.