राजगुरूनगर -देवालये, लग्न समारंभ, वाढदिवस आदी सर्व प्रकारच्या कार्यक्रमात फुले आणि फुलांच्या सुगंधाच्या दरवळीला करोना विषाणूंचा मोठा फटका बसला आहे. विविध फुलांची विक्रीच जवळपास बंद झाल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. एरवी फुलांच्या सजावटी आणि फुलांच्या सुगंधाची दरवळ करोना विषाणूंच्या धास्तीने “हरपली’ आहे.
फुलांचे मळे बहरले आहेत; मात्र फुलांची मागणी नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. हरितगृहातील जरबेरा, गुलाब उत्पादकांना याचा मोठा फटका बसत आहे. हरितगृहांतील गुलाबाची फुले बाजारात सध्या जात नसली तरी ती दररोज फुले तोडून फेकावी लागत आहे. त्यामुळे मजुरी, दररोज झाडांना पाणी, खते, औषधे हा खर्च करावाच लागतो. एकरभर हरितगृहांत महिना दोन ते अडीच लाख रुपये खर्च होत असतो. होणारा तोटा सहन करून गुलाबाची झाडे टिकवून ठेवावी लागत आहे. गुलाब शेती आता तोट्यात असल्याचे फूल उत्पादक शेतकरी प्रल्हाद पोतेकर आणि दीपक दप्तरे यांनी सांगितले.
करोना विषाणूच्या प्रभावामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांबरोबर हरितगृहातून देशात परदेशात जाणाऱ्या विविध फुलांचे उत्पादन घेणाऱ्या हरितगृह मालक शेतकरी मोठ्या अर्थिक संकटात आले आहे. जिल्ह्यात सुमारे दीड हजार एकरमध्ये हरितगृहांत विविध फुलांचे उत्पादन काढणारे फूल उत्पादक व्यवसाय अडचणीत सापडला आहे. मावळ तालुक्यातील आंबी परिसरात जवळपास 500 एकरवर हरितगृहांतील फुलांचे मोठा उद्योग व्यवसाय करोनाच्या व्हायरसने संकटात सापडल्याने त्यात काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
गुलाब रुपयालाही कोणी घेईना
फुलांची निर्यात बंद आणि फूलबाजार बंद असल्यामुळे मोठे नुकसान होत आहे. बाजारात एका गुलाबाच्या फुलाला 4 ते 5 रुपयाला भाव मिळतो, मात्र तेच फूल एक रुपयाला कोणी घेत नसल्याने फेकून द्यावी लागत असल्याचे खेड तालुक्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.
जागतिक बाजार पेठेत आमच्या पॉलिहाऊदेमधील गुलाबाची फुले जात होती, मात्र करोनामुळे जागतिक ते स्थानिक बाजारपेठ बंद झाल्याने फूल व्यावसायिकांवर मोठे संकट आले आहे. 6 एकर पॉलिहाऊसमध्ये असलेली गुलाबाची शेती वाया चालली आहे. त्यासाठी 25 मजूरांची मजुरी, खते औषधे यांचा अतिरिक्त खर्च वाढत चालला आहे. काढणी योग्य आलेली फुले तोडून कचऱ्यात फेकून द्यावी लागत आहेत.
– देवराम पोतेकर, मालक, शिवपूष्प नर्सरी, राजगुरूनगर