हिंजवडी, दि. 21 – आयटी क्षेत्राचा विस्तार होत असतानाही मूलभूत नागरी व पायाभूत सुविधा प्रभावीपणे राबवत गावचा कायापालट करण्याबरोबर शेती, अध्यात्म, शिक्षण, संस्कार महिला सबलीकरण तसेच संस्कृतीची जपणूक करणाऱ्या माण गावाचा मला सार्थ अभिमान असल्याचे गौरोवोद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी आयटीनगरी माण येथे काढले.
माण (ता. मुळशी) ग्रामपंचायतीने सुमारे सात कोटी ग्रामनिधीतून तीन एमएलडी क्षमता असलेले मैला शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) उभारला आहे. असा प्रकल्प उभारणारी माण ग्रामपंचायत ही जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली असावी. या प्रकल्पाचे उद्घाटन सुळे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. या वेळी त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, देश व राज्य पातळीवरील प्रत्येक पुरस्कार पटकविणाऱ्या या ग्रामपंचायतीने केलेल्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी तसेच ही नियोजनबद्ध कामे दाखविण्यासाठी आपण केंद्रातील ग्रामविकास मंत्र्यांना माणला येण्याचे निमंत्रण देऊ. यानिमित्ताने ग्रामपंचायतीने केलेला विकासाचा पॅटर्न त्यांना दाखवून ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर कसा विकास केला जातो हे दाखवून देऊ.
ग्रामपंचायतीचे महिला सबलीकरणासाठीचे काम व प्रशिक्षण पाहून या भागांतील महिला बचत गटांना विविध प्रकारचे व्यावसायिक ट्रेनिंग देणार आहोत. रिलायन्सच्या मदतीने या बचत गटांचे शॉपिंग मॉल असणारे माण हे पहिले गाव असणार आहे. महागाई व प्रंचड बेरोजगारी वाढली, अजित पवार पालकमंत्री होते तेव्हा या भागाचे प्रश्न तातडीने सूटत होते. सत्ता बदल होताच पुणे जिल्ह्याच्या विकासाचा वेग मंदावला आहे.
विकास सोसायटीचे माजी चेअरमन सुरेश पारखी यांनी येथील गंगाराम वाडीला रस्ता नाही. तसेच ड्रेनेज व मूलभूत प्रश्नांकड लक्ष वेधले. एमआयडीसीच्या दुर्लक्षामुळे जय गणेश कॉलनीतील पाणी व इतर नागरी समस्या सोडविण्याची मागणी त्यांनी सुळे यांच्याकडे केली. या वेळी गंगाराम वाडीतील महिलांनी सुळे यांना घेराव घालून आपल्या समस्यांचा पाढा वाचला.
मुळशी प्रादेशिक टप्पा क्रमांक दोन पाणी योजना लवकर सुरू झाली तर पूर्व पट्ट्यातील 14 गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागेल. एमआयडीसीने शेतकऱ्यांच्या जमिनींवरील शिक्के काढून त्यांना आपल्या जमिनी विकसनासाठी देता येतील यासाठी ताईंनी पुढाकार घेऊन उद्योग मंत्र्यांशी बैठक लावावी, असे महादेव कोंढरे यांनी ग्रामस्थांच्या वतीने भूमिका मांडली. या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, माजी सभापती पांडुरंग ओझरकर, सरपंच अर्चना आढाव, उपसरपंच शशिकांत धुमाळ, विस्तार अधिकारी सुनील जाधव, ग्रामविकास अधिकारी मदन शेलार, कुंडलिक जांभूळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अंजली कांबळे, माजी सभापती कोमल वाशिवले, पक्षाच्या महिलाध्यक्षा दीपाली कोकरे, सागर साखरे, संदीप साठे, दगडू करंजावणे, रवी बोडके, पंडित गवारे, देविदास सावंत, सचिन आढाव, अमृता हिंगडे सर्व महिला ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. तंटामुक्तीचे अध्यक्ष राम बोडके यांनी प्रस्ताविक केले. प्रसन्न ओझरकर यांनी सूत्रसंचालन केले.
तर पक्षांतर करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ
आपल्या मनोगतात महादेव कोंढरे म्हणाले, ताई माण ग्रामपंचायत नेहमी राष्ट्रवादीच्या मागे उभी राहिली आहे. गेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत सभापती पांडुरंग ओझरकर यांनी माण गणातून सात हजारांचे मताधिक्य दिल्याने जिल्हा परिषदेचा उमेदवार निवडून आला. मात्र, पक्षाने सर्वकाही देऊनही त्याने आता पक्षांतर केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. आशा शब्दांत जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर यांचे नाव न घेता कोंढरे यांनी त्यांच्यावर टीका केली.