मुंबई – जागतिक क्रिकेटची सूत्रे हाती असलेले सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ अशी ओळख असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) बक्षिस रकमेत वैश्विक मंदीचे कारण पुढे करत कपात केली आहे.
यंदा स्पर्धेतील विजेत्या संघाला 10 कोटी रुपये मिळणार आहेत, गतवर्षी हीच रक्कम 20 कोटी इतकी होती, त्यात यंदा पन्नास टक्के कपात करण्यात आली आहे.
आयपीएलमधील सर्व संघ मालकांनी मंडळाकडे याबाबत फेरविचार करण्याची विनंती केली असून स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटचा तळागाळापर्यंत प्रसार करण्याच्या प्रयत्नांना या निर्णयामुळे बाधा येईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक क्रिकेटच्या अर्थविषयक नाड्या मंडळाच्या हातात आहेत, तरी देखील मंदीचे कारण पुढे करत मंडळाला सध्या आर्थिक चणचण भासत असल्याचेही सांगण्यात आहे.
केवळ बक्षिसाच्या रकमेतच नव्हे तर स्पर्धेच्या आयोजनाखाली होणाऱ्या खर्चालाही कात्री लावण्यात येणार आहे. याबाबत सर्व संघांच्या मालकांना मंडळाने विस्तृत पत्र पाठवले आहे. त्यात या स्पर्धेसाठी यंदापासून नव्याने तयार करण्यात आलेला आराखडाही पाठविण्यात आला आहे.
सेलिब्रिटींचा सहभाग आसलेल्या दिमाखदार सोहळ्याऐवजी साधेपणाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी होणारा अतिरिक्त खर्चावरही (प्ले ऑफ स्टॅडिंग फंड) नियंत्रण लावण्यात येणार आहे. विजेत्या संघाला 10 कोटी, उपविजेत्या संघाला 6.25 कोटी, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांना 4.37 कोटी दिले जाणार आहेत.
गतवर्षी विजेत्या मुंबई इंडियन्सला 20 कोटी तर, उपविजेत्या संघाला 12.5 कोटी रुपये देण्यात आले होते. पदाधिकारी तसेच सपोर्ट स्टाफला विमान प्रवासासाठी बिझनेस क्लासचा खर्च दिला जात होता तो यंदापासून इकॉनॉमी क्लासचाच दिला
जाणार आहे.