मुंबई: राज्य सरकारने काही अटींसह चित्रपट अथवा टीव्ही मालिकांचे चित्रीकरण सुरू करण्यास अनुमती दिली असली तरी राज्य सरकारने ज्या अटी घातल्या आहेत त्याची पुर्तता करून चित्रीकरण करण्यास असंख्य अडचणी येत असल्याने अजूनही तरी या अनुमती मुळे कोठेही चित्रीकरण प्रक्रिया सुरू झाली नसल्याचे सध्याचे चित्र आहे. ही चित्रीकरण प्रक्रिया सुरू करण्यास आणखी काही कालावधी जाऊ द्यावा लागेल आणि दरम्यानच्या काळात या अटींमध्ये आणखी शिथीलता कधी येईल याची हे चित्रपट व मालिका निर्माते वाट पहात आहेत.
नेहमीच्या कर्मचारी वर्गापेक्षा एक तृतियांश कर्मचारी घेऊनच त्यांना चित्रीकरण करण्यास सांगण्यात आले आहे. त्या खेरीज सोशल डिस्टसिंग वगैरे निकषही त्यांना पाळावे लागणार आहेत. त्यामुळे चित्रीकरणातील प्रेम प्रसंगांसह अन्य प्रसंगांच्या चित्रीकरणावरही बंधने असणार आहेत. त्यामुळे ही बंधने शिथिल करावीत अशी या क्षेत्रातील लोकांची प्रमुख मागणी आहे. क्राउड सीन किंवा गाण्यांचे चित्रीकरणही या बंधनामुळे करता येणे शक्य नाही असे अनेक निर्मात्यांचे म्हणणे आहे.
इंडियन फिल्म ऍन्ड डायरेक्टर्स असोशिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित यांनी सांगितले की, चित्रीकरणासाठी सरकारच्या गाईडलाईन्स फॉलो करता येणे मुष्किल ठरते आहे. मुंबईत रोज चित्रीकरणाचे 60 ते 70 सेट्स उभारलेल जातात. त्या सर्व ठिकाणी गाईडलाईन्स नुसार ऍमब्युलन्स, डॉक्टर्स उपस्थित ठेवणे कसे शक्य आहे असा सवाल त्यांनी केला आहे. उपस्थित व्यक्तींच्या वयाचीही अट सरकारने घातली आहे. वयाची बंधनेही तेथे पाळता येणार नाहीत असेही त्यांनी सांगितले.
सरकारने घातलेल्या वयाच्या अटीनुसार अमिताभ बच्चन, मिथून चक्रवर्ती, अनुपम खेर अशा ज्येष्ठांना चित्रीकरणात भाग घेता येणार नाही. चित्रपट सृष्टीत त्यांच्याच वयाचे तंत्रज्ञही असतात. त्यांच्याशिवाय हे काम करता येणार नाही. त्यामुळे या बंधनांमध्ये शिथीलता असावी असे निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
भुल भुलैया 2 या चित्रपटासाठी लखनौ मध्ये चित्रीकरण करणारे दिग्दर्शक अनीस बाजमी यांनी सांगितले की, आम्हाला किमान उपस्थितीची अट पाळण्यासाठी मोठेच प्लॅनिंग करावे लागते. आमचे लखनौ मधील शुटिंग आऊटडोर असल्याने आम्हाला तेथे किमान 350 ते 400 माणसांची गरज लागते. त्याच्या एकतृतियांश लोकांनाच घेऊन शुटिंग करण्याची अट आम्हाला पाळता येणे शक्य नाही, त्याचा काही उपयोग नाही असे ते म्हणाले. या अटींसह शुटींग करण्याने आमचे बजेटही वाढते असे ते म्हणाले. टी सीरिजचे भुषण कुमार म्हणाले की आम्हाला आमच्या शुटिंग मधील लोकांच्या सुरक्षेची हमी मिळाल्याशिवाय आम्ही कामच न करण्याचे ठरवले आहे.