नवी दिल्ली – पंतप्रधानांनी उद्या (रविवारी) रात्री 9 वाजता दीपप्रज्वलन करण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाच्या दरम्यान देशभरातील वीज पुरवठा खंडीत केला जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र ही भीती अनाठायी असल्याचे उर्जा मंत्रालयाने म्हटले आहे. ही शंका चुकीची असून मागणीतील चढउतार हाताळण्यासाठी सर्व प्रोटोकॉल अनुसरले जात आहेत, असे उर्जा मंत्रालयाने म्हटले आहे. रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी मेणबत्ती, मोबाईल फ्लॅश लाईट लावून सामुदायिक योगदानातील आपली कटिबद्धता व्यक्त करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
एक वर्षा पूर्वीच्या तुलनेत 2 एप्रिल रोजीची वीजेची मागणी 125.81 जीडब्ल्यू इतकी घटली आहे. वीजेच्या मागणीत अचानक घसरण झाली असतानाच ब्लॅकआऊटमुळे विजेच्या ग्रीडवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ब्लॅकआऊटमुळे वीजपुरवठ्यात अस्थिरता आणि अनियमितता येण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र ही भीती अनाठायी आहे. भारतीय वीज पुरवठा यंत्रणा स्थिर आणि सक्षम आहे. वीज पुरवठ्यातील उतारचढावांची मागणी हाताळण्यासाठी योग्य निकषच अनुसरले जात आहेत, असे उर्जा मंत्रालयाने म्हटले आहे.
पंतप्रधानांनी घरातील दिवे बंद करण्याचे आवाहन केले आहे. रस्त्यावरील दिवे सुरूच राहणार आहेत. संगणक, टीव्ही, पंखे, फ्रिज आणि एसी सारखी उपकरणे बंद करण्याची कोणतीही सूचना नाही. तसेच हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, महापालिकेच्या सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील दिवे बंद करण्याची सूचना नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडीत केला जाणार नाही, असे उर्जा मंत्रालयाने म्हटले आहे.