परभणी – धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी शुक्रवार (दि. 17) पासून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे पुन्हा आमरण उपोषणाला सुरूवात करण्यात येणार आहे, अशी घोषणा बुधवारी (दि.15) सुरेश बंडगर यांच्यासह सकल धनगर समाज बांधवांनी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
यशवंत सेनेचे प्रदेश सरचिटणीस सुरेश बंडगर, प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब रुपनर यांनी चौंडी येथे धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण द्यावे या मागणीसाठी 21 दिवसांचे अमरण उपोषण केले होते. राज्य सरकारच्या वतीने 50 दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते मात्र 50 दिवसांचे अल्टिमेटम संपूनही राज्य सरकार कुठल्याच ठोस भूमिकेवर न आल्याच्या निषेधार्थ सकल धनगर समाज बांधवांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली.
धनगर समाज आरक्षणाची लढाई कुठल्याही परिस्थितीत अर्ध्यात सोडून देणार नाहीत, धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळाल्याशिवाय उपोषण आता मागे घेणार नाहीत, अशी घोषणा यावेळी धनगर समाज बांधवांच्या वतीने उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांनी केली.