गोपेश्वर : चारधामपैकी एक बद्रिनाथचे प्रवेशद्वार असलेल्या जोशीमठ गावात भूस्खलन होऊ लागल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे पाचशेहून अधिक घरांना तडे गेले असून याठिकाणच्या अतिधोकादायक घरांमध्ये राहणाऱ्या ५० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. ६०० कुटुंबांचे तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी दिले असल्याचे म्हटले जात आहे.
जोशीमठ गावातील रस्त्यांना मोठमोठय़ा भेगा पडू लागल्या आहेत, तर अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. तसेच सुमारे पाचशेहून अधिक घरांना तडे गेले आहेत. घरे धोकादायक बनल्याने अनेक कुटुंबांना हाडे गोठवणाऱ्या थंडीत रात्र काढावी लागली. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत नागरिकांनी शुक्रवारी रस्त्यांनावर ठाण मांडले.
जोशीमठ येथे सुरू असलेल्या नॅशनल थर्मल पॉवर प्रकल्पामुळेच गावाला धोका निर्माण झाल्याचा आरोप करीत नागरिकांनी शुक्रवारी बंद पाळून प्रशासनाविरोधात असंतोष व्यक्त केला. मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी आज, शनिवारी जोशीमठला भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती घेणार आहेत. मुख्यमंत्री धामी म्हणाले, ‘‘भाजपचे एक पथक जोशीमठ येथे पाठवण्यात आले असून आपण शनिवारी तेथे भेट देणार आहोत.’’
जोशीमठ येथील ५६० घरांना तडे गेल्याने आणि अनेक ठिकाणची जमीन खचल्याने शुक्रवारी तेथील नागरिकांनी जोरदार निदर्शनेही केली. प्रशासनाविरोधात घोषणा देत लोक रस्त्यावर उतरले. दुकाने आणि आस्थापना बंद करण्यात आल्या. तसेच काही नागरिकांनी रस्ता अडवला, असे जोशीमठ बचाव संघर्ष समितीचे निमंत्रक अतुल सती यांनी सांगितले. प्रशासनाने अतिधोकादायक घरांतील ५० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.