पणजी – गोव्यात सुरू असलेल्या 50 व्या इफ्फी दरम्यान कौशिक गांगुली यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि प्रसेनजित चॅटर्जी यांनी अभिनय केलेला ‘ज्येष्ठपुत्रों’ हा बंगाली चित्रपट दाखवण्यात आला. ज्येष्ठ बंगाली आणि हिंदी दिग्दर्शक रितुपर्णो घोष यांनी या चित्रपटाची कथा लिहिली होती. तसेच ते लवकरच निर्मितीही करणार होते. मात्र, त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांचे हे अपूरे राहिलेले स्वप्न दिग्दर्शक कौशिक गांगुली यांनी पूर्ण केले.
कौशिक यांनी बनवलेली ही कलाकृती म्हणजे रितुपर्णो यांच्या कलाकृतीचेच प्रतिबिंब आहे, अशा भावना अभिनेता प्रसेनजित चॅटर्जी यांनी व्यक्त केल्या. इफ्फीदरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.एका सुपरस्टार अभिनेत्याच्या व्यक्तीगत, भावनिक जीवनाची किनार दाखविणारा हा चित्रपट आहे. 10 वर्षांनंतर आपल्या मूळ गावी आलेल्या या सुपरस्टार्सच्या भावनिक आंदोलनांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. चित्रपटाला कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपटात विभागणे योग्य नाही. दोन्ही प्रकारचे सिनेमा तेवढेच महत्त्वाचे असतात. चित्रपट चांगला की वाईट एवढेच अधिक महत्वाचे असते, असेही प्रसेनजित म्हणाले.