जेजुरी- सध्या लग्नसराईचे दिवस सुरू झाले आहेत. आपल्या मुला- मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात करण्याचा आई- वडिलांचा नेहमीच प्रयत्न असतो. वारेमाप खर्च करून वऱ्हाडी मंडळींना काहीही कमी पडू नये, असाच प्रयत्न होतो. लग्नसोहळा कायम लक्षात राहावा असाच आग्रह वधू- वरांकडून मातापित्याकडे होत असतो. थाटामाटात केलेल्या लग्न सोहळ्यातून वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्याचा एक हटके प्रयत्न पुरंदर तालुक्यातील नाझरे कडेपठार येथील चिकणे परिवाराने केला आहे. उपस्थित पाहुण्यांना वृक्ष देऊन वृक्षलागवडीचा संदेश दिला.
नाझरे सुपे येथील रहिवाशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन चिकणे, माजी उपसरपंच संदीप चिकणे यांच्या बहिणीचा, नीलम हिचा विवाह पिंपळे (ता. पुरंदर) येथील सागर पोमण यांच्याशी यश लॉन्स येथे थाटामाटात साजरा झाला. यावेळी मनसेचे युवा नेते अमित राजसाहेब ठाकरे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, ऍड. उज्ज्वल निकम यांचे चिरंजीव ऍड. अनिकेत निकम, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार सुनील कांबळे, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपाताई थोपटे, माजी आमदार अशोकराव टेकवडे, उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, येरवडा कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार, ठाणे कारागृहाचे अधीक्षक हर्षद अहिरराव, तहसिलदार तृप्ती कोलते, पुण्याच्या माजी महापौर कमलताई व्यवहारे, नगरसेवक वसंत मोरे, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य विजय भोईर, जालिदंर कामथे, दिलीपराव बाठे, सुदामराव इंगळे, डॉ. दिंगबर दुर्गाडे, माणिकराव झेंडे, तात्यासाहेब भिंताडे, बाबा जाधवराव, प. पू. शांतीनाथ महाराज उपस्थित होते.
या सर्वांना सत्काराबरोबर वृक्ष देऊन वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला. लग्नाला आलेल्या वऱ्हाडी मंडळींनाही जांभूळ, फणस, पेरू, चिक्कू, आवळा, आंबा, नारळ, चिंच आदी सुमारे एक हजार झाडे देऊन वृक्ष लागवडीचा संदेश देण्यात आला आहे.