मुंबई – भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या शतकाचा दुष्काळ आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संपेल, असा विश्वास भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व संघ व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये त्याला एकही शतक फटकावता आलेले नाही. तसेच दुसऱ्या बाजूला दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याचा रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरूचा संघ आयपीएलमध्ये अपयशी ठरला. त्यानंतर कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचा टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानने दारुण पराभव केला.
भारतीय संघ टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या साखळी गटातूनच बाहेर पडला. त्याने आयपीएलमध्ये आरसीबीचे कर्णधारपद सोडले, मग भारताच्या टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले, त्यानंतर आता एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही त्याने गमावले आहे. कोहलीने गेल्या काही दिवसांत खूप काही गमावले आहे. त्यामुळे कोहली त्याच्या सुमार कामगिरीमुळे चिंतेत आहे.
गेल्या दोन वर्षात त्याने क्रिकेटच्या कोणत्याही प्रकरात शतक फटकावलेले नाही.ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व न्यूझीलंडविरुद्धही तो अपयशीच ठरला. कोहलीची 70 आंतरराष्ट्रीय शतके असून त्याचा शतकांचा दुष्काळ दक्षिण आफ्रिकेत दूर होईल, असा विश्वासही मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह बीसीसीआयने व्यक्त केला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका 26 डिसेंबरपासून सुरू होत असून भारतीय कसोटी कर्णधार आपल्या शतकांचा दुष्काळ नक्कीच संपवेल, अशी अपेक्षा त्याचे चाहतेही व्यक्त करत आहेत. कोहलीने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी कोहली नेटमध्ये कसून सराव करत आहे. कोहलीचा फलंदाजीचा सराव मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
कोहली सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. तो खेळाडू म्हणून कितीही मोठा असला तरी त्याच्याकडून चुका नक्कीच होतात. कोहलीच्या या चुकांवर प्रशिक्षक द्रविड लक्ष ठेवून आहेत. बीसीसीआयने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये कोहली ड्राईव्ह खेळत आहे, त्यानंतर द्रविड त्याला काही सल्लेही देत आहे. कोहली बॅट वेगाने बॉलकडे नेत आहे, कदाचित द्रविड त्याला हलकी बॅट वापरण्याचा सल्ला देत असावा असेही जाणवत आहे.
कोहलीने दक्षिण आफ्रिकेत 5 कसोटी सामन्यात 55.80 च्या सरासरीने 558 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 2 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. कोहली दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा कसोटी सामना खेळला तेव्हा त्याने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात 96 धावा केल्या होत्या. गेल्या वेळी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कोहलीने शतक आणि अर्धशतक झळकावले होते. सेंच्युरियन मैदानावर कोहलीने शतक फटकावले आहे, जिथे यावेळी कसोटी मालिकेतील पहिला सामना होणार आहे. या सामन्यात कोहलीची बॅट तळपेल आणि त्याच्या शतकांचा दुष्काळही संपेल, अशी अपेक्षा आहे.