चार दिवसानंतर भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यातील शाळा सुरू होणार
पुणे – मागील 24 तासांत जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर कमी झाला आहे. पाऊस आणि पुरामुळे विस्कळित झालेले जनजीवन हळूहळू सुधारत आहे. गुरूवारी (दि. 8) दिवसभरात मावळ तालुक्यात सर्वाधिक 73 मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, पाऊस कमी झाल्यामुळे चार दिवसांपासून बंद असलेल्या शाळा उद्या सुरू होणार आहेत.
जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले होते. हवामान विभागाकडून शहर आणि काही तालुक्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली होती. त्यानुसार मुळशी, मावळ याठिकाणी अतिवृष्टी झाली. तर धरणक्षेत्रातील जोरदार पावसामुळे धरणे शंभर टक्के भरली आणि मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू होता. तसेच शहरातील संततधार पावसामुळे वाहतुकीचा खेळखंडोबा झाला. नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे संसार उघड्यावर पडले आहेत. दरम्यान, दहा दिवसांच्या जोरदार पावसानंतर पावसाचा जोर कमी झाला असून पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी ओसरले आहे.
मुळशीत 53 मिमी पावसाची नोंद
आज दिवसभरात मावळ तालुक्यासह दररोज शंभरीच्या पुढे पडणाऱ्या मुळशीमध्ये 53 मिमी पावसाची नोंद झाली. वेल्हा तालुक्यात 69, भोरमध्ये 60 मिमी आणि जुन्नरमध्ये 37 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर नेहमीप्रमाणे बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर तालुक्यात “पावसाचा दुष्काळ’ होता. पुरंदरमध्ये 8 आणि खेडमध्ये 16 आणि आंबेगावमध्ये 9 मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील पुढील दोन दिवस पावसाचा जोर कमी असेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.