प्रसाद शेटे
शहराची अवस्था बकाल; बहुतांश नगरसेवक आपल्या प्रभागातच मर्यादित
मेढा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नगराध्यक्ष आणि भाजपची साथ त्यातून सुरू असलेली पक्षीय वर्चस्वाची लढाई. या सत्तेच्या राजकारणात मेढा शहराच्या खुंटलेल्या विकासाला गती मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. आपण पूर्ण शहराचे आहोत, याचा विसर लोकप्रतिनिधींना पडला असल्याचेच दिसते. कारण बहुतांश नगरसेवक आपल्या प्रभागातच मर्यादित झाले आहेत. विकासाचे राजकारण अपेक्षित असताना मेढा नगरपंचायतीच्या माध्यमातून प्रत्यक्षात विकास बाजूला पडला असून केवळ राजकारण सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आतापर्यंत शहराच्या हिताचे काहीही होताना दिसत नाही. शहराची अवस्था बकाल झाली आहे. रस्त्यांवर खड्डे पडले आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग लागले आहेत. नाले तुंबले आहेत, रस्त्यांची सफाई होताना दिसत नाही. एलईडी खांबावर आहे, असे सांगितले जाते. परंतु, प्रत्यक्षात ते कधी लागलेले तर कधी नाही, अशी अवस्था आहे. “एलईडी’ येणार म्हणून जुन्या दिव्यांचा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे. काही प्रभागांत या खुंटलेल्या विकासाबाबत प्रचंड ओरड होताना दिसते.
प्रशासनाच्या खुर्चीतील चेहरा बदलला, मात्र या बदलाचा शहराच्या विकासासाठी कोणताही फायदा हाणार की नाही हा प्रश्न आहे. प्रशासन केवळ नेतेमंडळीच्या इशाऱ्यावर कामकाज चालवत आहे. कचऱ्याचे योग्य नियोजन करण्यात अद्याप यश आलेले नाही. निवडणुकीपूर्वी स्वच्छ व सुंदर मेढ्याचा नारा दिला होता. परंतु, हे वास्तव कुठे दिसत नाही. प्रत्यक्षात शहराची स्थिती अगदीच विपरित आहे. विकासावर आग्रही राहण्याऐवजी लोकप्रतिनिधी देयकातच धन्यता मानता दिसत आहे.जिरवाजीरवीच्या राजकारणात लोकप्रतिनिधींची अनेक वर्षे निघून गेली. मात्र, विकास अद्याप हरवलेला आहे.
मेढा शहरात आपापल्या माध्यमांतून कसा विकास घडेल, यापेक्षा विरोधकांची कुठे जिरवण्यात येईल, यात लोकप्रतिनिधींना समाधान वाटतं आहे. मेढा शहराला लागूनच असलेल्या जवळवाडीसारख्या गावाने एकजुटीच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली. मेढ्याच्या गल्लोगल्ली बेरोजगार “चाणक्य’ तयार होताना दिसत आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या मुख्य ठिकाणांच्या तुलनेत मेढा शहर कितीतरी अंतर मागे राहिला आहे. मेढा शहरात एकही रोजगाराची सुविधा नाही, क्रीडा प्रकारात कोणतीही संधी नाही. एवढेच काय साधे मैदानदेखील नाही. जनजागृतीचे कोणतेही उपक्रम नाहीत. याची त्याची जिरवण्यापेक्षा तीच ताकद मेढ्यातील विकासासाठी केली तर शहराचे चित्र बदलू शकते.
विकासासाठी स्पर्धा केली तर मेढा शहर स्वप्नवत होण्यास अवकाश नाही लागणार. मेढ्याचा विकास म्हणजे जावळी तालुक्याचा विकास आणि ही गोष्ट लोकप्रतिनिधींनी आपल्या मनात बिंबवली पाहिजे. आपल्या शहरात आणखी कोणता निधी उपलब्ध होऊ शकतो, यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.