पुणे – जागरूकता हा लोकशाहीचा आत्मा आहे. अधिकारारूढ पक्षाने लोकमताला मान देत राहिले पाहिजे, तसेच विरोधी पक्षाने केलेल्या टीकेबद्दल तक्रार करता कामा नये. लोकमत आपल्याला हलकेहलके अनुकूल करून घेण्यासाठी सरकारवर टीका करणे व सरकारी कारभारातील उणिवांवर अचूक घाव घालणे हे विरोधी पक्षाचे कर्तव्यच आहे. हा सर्व व्यवहार संयमाने चालला म्हणजे लोकशाहीची प्रकृती निकोप राहते, असे विवेचन आज काकासाहेब गाडगीळ यांनी आपल्या “पार्लमेंटमधील अनुभव’ या विषयावरील भाषणात केले.
खासदारांचा पगार योग्य
पार्लमेंटच्या सभासदांना जो पगार दिला जातो त्यासंबंधी होणाऱ्या टीकेचा परामर्श घेताना ते म्हणाले की, पार्लमेंटच्या वर्षातील तीन बैठकी व तद्नुषंगिक निर्माण होणारी कामे जर मनापासून करावयाची असतील तर पार्लमेंटच्या सभासदाला कोणताही व्यवसाय करणे अशक्य आहे. मतदारांकडून येणाऱ्या पत्रांना उत्तरे पाठविणे,
मतदार संघातील लोकमत समजून घेण्याची व्यवस्था करणे, पार्लमेंटमधील विविध विषयावर माहितीपूर्ण भाषणे करण्यासाठी वाचन करणे व जरूर ती पुस्तके विकत घेणे यासाठी जो खर्च होतो तो लक्षात घेता पार्लमेंटच्या सभासदांना देण्यात येणारा पगार योग्य आहे असे म्हणावे लागेल.
आधुनिकीकरण हवे
आधुनिकीकरणाबद्दल बोलताना काकासाहेब म्हणाले की, यंत्रसामग्रीच्या आधुनिकीकरणास विरोध करणे बरोबर नाही. देशाच्या संरक्षणाचा व स्वाथ्याचा प्रश्न त्याच्याशी निगडीत आहे. आधुनिकीकरणामुळे काही कामगार बेकार होतात हे खरे पण ही बेकारी तात्पुरत्या स्वरूपात असते. संक्रमणावस्थेत थोडा त्रास झाला तरी अंति ते हितावहच ठरते.
बैलगाड्या गेल्या व रेल्वे आली तेव्हा अशीच टीका होत होती. तथापि आधुनिकीकरण क्रमाने व्हावे व बेकार झालेल्यांना अन्य कामधंदा मिळावा अशी व्यवस्था होणे जरूर आहे. कायदेमंडळात काय काम चालते ते मतदारांना कळवीत जावे व मतदारांचे काय म्हणणे आहे ते समजून घ्यावे, हे निवडलेल्या प्रतिनिधीचे कर्तव्यच आहे व त्याच विचाराने आज मी आपणासमोर बोलत आहे, असा समारोप काकासाहेब गाडगीळ यांनी केला.