पाबळ – येथील मस्तानी स्मृतिस्थळाचे धनाच्या लालसेने उत्खनन झाल्यानंतर करण्यात आलेले पुनर्निर्माणाचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे तसेच चुकीचे पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप करताना येथे आलेल्या मस्तानीचे वंशजांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या स्थळाचे पुनर्बांधकाम त्याच कंत्राटरदाराकडून करण्यात यावे अन्यथा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
पुणे येथील “मस्तानी जीवन शोध’ या पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रमास मस्तानीचे सातवे, आठवे व नववे वंशज आपल्या कुटुंबीयासह आले होते. त्यानंतर त्यांनी पाबळ येथील स्मृतिस्थळास भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थांनी मूळ वस्तूची छायाचित्रे त्यांना दाखवली. यानंतर आता होत असलेल्या कामाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आणि या स्मृतिस्थळाचे मूळ स्वरूप परत निर्माण करण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पाबळ ग्रामस्थांनी व बाजीराव-मस्तानी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी या स्थळाच्या पुनर्निर्माणासाठी आलेल्या निधीची त्यांना कल्पना दिली. त्यातून झालेल्या कामाबद्दल व संबंधित ठेकेदाराबाबत त्यांनी संताप व्यक्त केला.
हे काम पुरातत्व खात्याने आमच्या अखत्यारीत करण्यात येणार असल्याचे व ही वास्तू तेथील समाधी, मशीद व इतर कलाकुसरीची कामे “जसे होते तसे’ करण्यात येईल असे सांगून कामाला सुरुवात केली होती. त्यामुळे ग्रामस्थांनीही याबाबत हस्तक्षेप टाळला होता. याच सहकार्याचा फायदा घेऊन ठेकेदाराने पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून “चुना’ लावण्याचे काम करून पलायन केले. याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
त्यानंतर दोनच वर्षात या झालेल्या कामाची पडझड सुरू झाल्याची बाब पुढे येऊ लागली. पाबळ येथील लेखक शंकर नऱ्हे यांनी न झालेल्या कामाची यादीच सादर केली होती. या कामाचे स्ट्रॅक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी केली होती. त्यावर पंधरा दिवसांत येतो, असे सांगितलेल्या ठेकेदाराने पुन्हा तोंड दाखवले नाही, ही माहिती मस्तानीचे वंशजांना देण्यात आली. तेव्हा त्यांनी संताप व्यक्त केला.
ठेकेदाराची सुट्टी नाही
मध्यप्रदेशात उच्च अधिकारी असलेल्या एका वंशजांने आपले पद लिहू नका असे सांगून, मी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली. आणि ही प्रतिक्रिया म्हणजे, ठेकेदारांची सुटका नाही, असे समजा असे सांगितले.