राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील मोजणी विभागातील तालुका भूमी उपअधीक्षक हे गेल्या अनेक महिन्यांपासून सतत गैरहजर राहत असल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपिल कलमांतर्गत तात्काळ कारवाई करण्याची मागणी रिपाइं (आठवले) श्रमिक ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोषनाना डोळ्स यांनी निवेदनाद्वारे वरिष्ठांकडे केली आहे.
शेतकर्यांच्या अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या मोजणी विभागात गेले अनेक महिन्यांपासून मुख्य अधिकारी सतत गैरहजर रहात आहेत त्यामुळे नागरिकांचे कामे होत नाहीत उलट त्यांना अर्थिक खर्च करून मोघम हेलपाट्यांना सामोरे जावे लागत आहे.
नागरिकांची या खात्याशी निगडीत असलेले संकलित योजनापत्रक, गटनकाशा, फाळणीनकाशा, टिपण, चतुरसिमा,क-पत्रक, आकारबंद, आकारफोड, गावनकाशा, गुणाकार बुक, साधी-तात्काळ- अतितात्काळ जमिनीची मोजणी, फाळणीबारा, जमीन एकत्रिकरण यांसह अनेक विषयांचे संकलन मुख्य अधिकारीच सतत गैरहजर राहत असल्याने कार्यालयातील गोंधळ आणि भोंगळ कारभार सुरू आहे.
सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक होत आहे. ही बाब अत्यंत गैरवर्तन करणारी ठरत आहे तरी याबाबतचा निर्णय वरिष्ठांकडून तात्काळ निर्णय घेण्यात यावा, अन्यथा पक्षाच्या वतीने प्रांत कार्यालय खेड येथे जाहीर अंदोलन करण्यात येईल, असा इशारा डोळ्स यांनी दिला आहे याबाबतचे निवेदन त्यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांना दिले आहे