केंदूर -चासकमान धरणाचे पाणी कोरेगाव – धानोरे शाखेच्या चारीला मिळावे, म्हणून जातेगाव, करंदी, पिंपळे जगतापच्या शेतकऱ्यांनी चक्री उपोषण सुरू केले होते. त्याची दखल घेऊन चासकमानच्या तीन अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून रविवारी (दि. 10) त्या चारीला पाणी सोडण्याची लिखित स्वरूपात मागणी मान्य केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. मात्र शनिवारी (दि. 9) दुपारी शाखा अभियंता महेंद्र गायकवाड यांनी सहाय्यक अभियंता यांचे पाणी रविवारी देण्यास असमर्थ असल्याचे पत्रक शेतकऱ्यांना दिले, मात्र ते पत्र शेतकऱ्यांनी माघारी दिले.
दरम्यान अशा प्रकारे शेतकऱ्यांचे आंदोलन अधिकाऱ्यांनी खोटे आश्वासन देऊन दडपण्याचा प्रयत्न करत पाणी देण्यास नकार दिल्याने परिसरातील दोनशेहून अधिक शेतकरी आक्रमक झाले आहेत. रविवारी आम्हाला पाणी मिळाले नाही, तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि त्यास संपूर्ण पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार असतील अशा आशयाचे पत्रदेखील उपोषणकर्त्यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनला दिले आहे.
त्यामुळे कोरेगाव – धानोरे चारीला पाणी सोडण्यासाठी जर शेतकरी एकवटले आणि शेतकऱ्यांचा उद्रेक होऊन एखादा अनुचित प्रकार घडला तर उपोषणकर्त्यांना जबाबदार धरू नये, असा देखील इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.
याबाबत कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मीटिंग असल्याचे कारण सांगून या विषयावर बोलणे टाळले.