सांगली -गावी जाण्यासाठी प्रशासनाकडून सोय झाली, मी गावी जात आहे, ही आनंद वार्ता मित्राला देण्यासाठी पळत जाणाऱ्या उत्तर प्रदेश येथील परप्रांतीय राम सखा यांना गावी परतण्याआधीच मृत्यूने कवटाळले. विटा येथे गुरुवारी ही घटना घडली.
जिल्ह्यात अनेक उत्तर भारतीय असून त्यांना उत्तर प्रदेश येथे पाठविण्यासाठी मिरज रेल्वे स्थानकातून रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. गावी परत जाण्यासाठी विटा येथे काम करणारे उत्तर प्रदेशमधील राम सखा (वय 55) यांनी गावी परतण्यासाठी विटा तहसील कार्यालयात ऑनलाईन अर्ज केला होता. त्यांचा अर्ज मान्य करून रेल्वेचे तिकीट निश्चित करण्यात आले. त्यांना तहसील कार्यालयातून फोन गेला की “तुम्ही उद्या सकाळी विटा बस स्थानकात या. येथून तुम्हाला मिरज रेल्वे स्थानकापर्यंत बसने नेण्यात येणार आहे. तुमचे तिकीट देखील आहे आणि तुमची गावाकडे
जाण्याची सोय करण्यात आली आहे,’ असे सांगण्यात आले. ही माहिती मिळताच राम सखाला गगनात न मावणारा आनंद झाला आणि विटा येथील मुंढे मळ्यातील त्यांच्या मित्रास ही बातमी सांगण्यासाठी ते पळत सुटले. परंतु पळत असताना अचानक ते रस्त्यावर कोसळले. गावातील एकाने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.