मुंबई – बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यापासून त्याच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून सलमानला वाय दर्जाची सुरक्षा मिळाली आहे. सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही असतो.
काही दिवसांपूर्वीच झालेल्या एका मुलाखतीमध्ये सलमानने मुंबईपेक्षा दुबईमध्ये जास्त सुरक्षित वाटत असल्याचे सांगितले होते. यावरून त्याच्यावर सोशल मीडियावर टीका करण्यात आली होती. आता यात अभिनेत्री कंगणा राणावतने उडी घेतली आहे. कंगणाने सलमान विषयी काळजी व्यक्त केली आहे. तसेच त्याला घाबरु नकोस, असा सल्लाही दिला.
कंगणा म्हणाली की, ‘आपले पंतप्रधान आणि गृहमंत्री थोर आहेत. सलमान खान यांना जी सुरक्षा मिळाली आहे, ती केंद्र सरकारनं दिली आहे. ज्याची सुरक्षा खुद्द नरेंद्र मोदी आणि अमित शाह करत आहेत, त्यामुळे त्याने काळजी करू नये. त्याची चांगली सुरक्षा राखली जात आहे. त्याला काहीही होणार नाही. आता देश सुरक्षित लोकांच्या हातात आहे. मोदी असल्यावर तुला काळजी करण्याची गरज नाही. मला ही जेव्हा धमकी मिळाली होती तेव्हा मला देखील सुरक्षा मिळाली होती. तेव्हा मी म्हटलं होतं की देशातील सर्वात चांगल्या हातामध्ये आपली सुरक्षा असताना मी चिंता कशाला करू.’
काय म्हणाला होता सलमान खान ?
दरम्यान, सलमानने एका मुलाखतीत म्हंटले होते की, ‘मी जिथं जातो तिथं संपूर्ण सुरक्षा घेऊन जातो. जेव्हा मी दुबईत असतो तेव्हा मी थोडा निर्धास्त असतो. भारतात असतो तेव्हा काही अडचणी असतात. अर्थात जे व्हायचं आहे ते होणारच आहे. परंतु देवावर माझा विश्वास आहे. याचा अर्थ असा नाही मी बाहेर मोकळेपणानं फिरायला सुरुवात करेन. रस्त्यावर सायकल चालवणं आणि कुठेही एकट्यानं जाणं माझ्यासाठी कठीण होऊन बसलं आहे.”
“जेव्हा मी ट्रॅफिकमध्ये फसतो, तिथे तर जास्तच सुरक्षा असते. आणि मग आजुबाजूला असलेल्या गाड्या दुसऱ्या लोकांना अडचण निर्माण करतात. मग ते लोक मला तिरकस लूक देतात. अर्थात माझे चाहतेच असतात ते सगळे. पण माझ्या जीवाला धोका असल्याने ही सगळी सुरक्षा केली आहे.”