अहमदाबाद – गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये अर्थव्यवस्थेच्या सर्व घटकांना फटका बसला आहेच तसाच फटका देशातील विविध महानगरांमधील पेंइंग गेस्ट उद्योगालाही बसला आहे. नोकरीच्या किंवा शिक्षणाच्या निमित्ताने आपल्या गावाबाहेर जाऊन वास्तव्य करणाऱ्या लोकांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय करणाऱ्या पेईंग गेस्ट मालकांचा हा व्यवसाय गेले दीड वर्ष रडत खडत चालू असल्याने कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
हा व्यवसाय करणारे काही जण भाड्याने प्रॉपर्टी घेऊन हा व्यवसाय करत आहेत त्यांना हे भाडे मात्र द्यावे लागत आहे पण त्या प्रमाणात त्यांना उत्पन्न मात्र मिळत नसल्यामुळे अनेकांनी पर्यायी व्यवसाय सुरू केले आहेत.
अहमदाबाद शहरामध्ये गेले अनेक वर्षे पी जी सेंटर चालवणारे यश शहा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या शहरात तीन हजार पेक्षा जास्त आणि बडोदा शहरांमध्ये 500 पेक्षा जास्त पी जी सेंटर आहेत. त्यापैकी फक्त 300 सेंटर सुरू असून बाकी सर्व सेंटर बंद असल्यामुळे त्या मालकांना दरमहा 50 हजार ते दोन लाख रुपये पर्यंतचे नुकसान सहन करावे लागत आहे.
अहमदाबाद शहरातील 2600 आणि बडोदा शहरातील 400 पीजी सेंटर्सना दरमहा दीड लाख रुपयांचे नुकसान होत आहे असे गृहीत धरले तरी हा आकडा 45 कोटी रुपयांपर्यंत जातो गुजरातमधील दोन महत्त्वाच्या शहरांमधील अशी परिस्थिती असताना देशातील इतर सर्व महानगरांमध्ये अशीच परिस्थिती आहे.
पुणे मुंबई नाशिक नागपूर या ठिकाणी ही पीजी सेंटर चालवणाऱ्या घरमालकांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. अनेकांनी आपल्या घरांमध्ये किराणा दुकान किंवा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.
जी पीजी सेंटर काही प्रमाणात सुरू आहेत. तेथील विद्यार्थी किंवा नोकरदारांची संख्या अतिशय कमी झाली आहे. त्यामुळे या सेंटर्सना आपला खर्च भागवणे ही मुश्कील झाले आहे. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये देशात वर्क फ्रॉम होम संस्कृतीने उचल खाल्ल्याने आता नोकरदार आणि विद्यार्थी घरी बसूनच आपले काम करत असल्याने त्यांना पीजीचा सहारा आता घ्यावा लागत नाही.