कोलकता – पश्चिम बंगालची सत्ता हस्तगत करण्याच्या राजकीय शर्यतीत कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांची आघाडी मागे पडल्याचे चित्र सध्या तरी आहे. मात्र, कुणालाही बहुमत नसणारी त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास किंगमेकर बनण्याची आशा ती आघाडी बाळगून आहे.
बंगालच्या सत्तेसाठी तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपमध्ये प्रमुख लढत होणार असल्याचे विश्लेषण केले जात आहे. तसे असले तरी कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांच्या हातमिळवणीने त्या राज्यात तिसरी राजकीय शक्ती उभी राहिली आहे. त्या पक्षांनी इंडियन सेक्युलर फ्रंटला (आयएसएफ) बरोबर घेऊन संयुक्त मोर्चाची स्थापना केली आहे. त्यामुळे बंगालच्या सत्तेसाठी सुरूवातीला दुरंगी वाटणाऱ्या लढतीला काहीसे तिरंगी स्वरूप प्राप्त झाले आहे. कॉंग्रेस आणि डावे पक्ष बंगालमध्ये स्वत:चे राजकीय अस्तित्व ठळक करण्यासाठी काही वर्षांपासून झगडत आहेत. एकत्र येण्याने त्यांची ताकद दुर्लक्षित करता येणार नसल्याचे मानले जात आहे.
बंगालमध्ये कुठल्याच राजकीय पक्षाला बहुमत न मिळाल्यास संयुक्त मोर्चाचे महत्व वाढणार आहे. त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास कुणाच्या हाती सत्ता सोपवायची याचा निर्णय त्या आघाडीवर अवलंबून राहील. कॉंग्रेसमधील सुत्रांकडून तर आतापासूनच महाराष्ट्र मॉडेलच्या पुनरावृत्तीचे भाकीत केले जात आहे. भाजपला महाराष्ट्राच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष एकत्र आले.