मुंबई – उत्तर भारतातील थंडीचे लोण हळूहळू महाराष्ट्रात पसरत आहे. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा प्रथमच यंदाच्या हंगामातील नीचांकी पातळीवर आल्याने महाराष्ट्र गारठला आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ११ अंश तापमानाची नोंद झाली. पुणे, नाशिक, अहमदनगरमध्ये पारा १२ अंशांवर हाेता. तर पुढील तीन दिवस किमान तापमान आणखी घसरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली.
शनिवारी नगर जिल्ह्यातील जेऊर येथे १०.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर नाशिक १२, अहमदनगर १२, संभाजीनगर १३.४, परभणी १३, महाबळेश्वर १३, पुणे १४, बीड १४, जालना १४, नांदेड १४, जळगाव १४, अकोला १४ अशी तापमानाची नोंद झाली.
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात हवामान काेरडे व थंड आहे. अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांचा वेग कमी झाला तरी नैऋत्य बंगाल खाडीत विषुववृत्ताजवळ चक्राकार वारे आहेत. परिणामी कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. दरम्यान थंडी आणि धुक्यामुळे उत्तर भारतातून भुसावळ, मुंबई, पुणेकडे येणाऱ्या ११ गाड्या विलंबाने धावत आहेत.
देशातही थंडीत वाढ
उत्तर भारतातील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पसरली आहे. पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्लीच्या अनेक भागात किमान तापमान ४ ते ८ अंशांच्या दरम्यान आहे. तर पंजाबमधील अमृतसर आणि लुधियाना येथे देशातील नीचांकी ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यातच राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडीचे आगमन झाले आहे.