नोएडा –उत्तर प्रदेशात काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. त्यावर राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली. ईव्हीएम खराब झाल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. बहुधा, तरुण आणि शेतकऱ्यांकडून प्रचंड रागाने ईव्हीएमची बटणे दाबली जात आहेत, असे ट्विट त्यांनी केले.
अर्थात, इतक्या जोराने नको.आघाडीच्या बाजूने प्रेमाने बटणे दाबा, असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले. भाजप सरकारवर मतदार नाराज असल्याचा दावा सप-रालोद आघाडीकडून केला जात आहे. त्याचा संदर्भ घेऊन चौधरी यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला. प्रत्येक निवडणुकीवेळी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. मात्र, ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारींचा खुबीने वापर करून चौधरी यांनी भाजपला लक्ष्य केले.